वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि, २५ – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शिफारसीनंतर राजकीय अस्थैर्य अनुभवत असलेल्या अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी या आदेशावर सही केल्याचे वृत्त आहे. मात्र या या निर्णयाची अरुणाचलमधील सत्ताधारी काँग्रेसने तीव्र शब्दांत निंदा केली असून ही राजकीय असहिष्णुता असल्याचा आरोप केला आहे.
‘हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्राने एकदाही राज्य सरकारशी चर्चा केली नसून हा निर्णय अतिशय धक्कादायक आहे’ अशी प्रतिक्रिया अरूणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री नबाम तुकी यांनी व्यक्त केली आहे. ‘अरूणाचल प्रदेश हा अतिशय शांत भाग असून कायदा व सुव्यवस्थेला धक्का बसल्याची एकही घटना गेल्या महिन्याभरात घडलेली नाही’, असेही ते म्हणाले. ‘हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन असताना केंद्राने एवढ्या घाईने हा निर्णय घेण्याची काय गरज होती असा सवाल विचारत हा निर्णय अतिशय चुकीचा व सूडबुद्धीने घेण्यात आला आहे’ अशी टीकाही तुकी यांनी केली.