देशातील अर्धे ATM होणार बंद

0
15

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)- सध्याचे जग हे क्रेडिट आणि डेबिट कार्डचे आहे. अनेकजण पाकिटात पैसे ठेवण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी किंवा शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी करतो. पण गेल्या काही दिवसांपासून देशात एटीएमची संख्या कमी होत आहे. आरबीआयने लागू केलेल्या काही नियमावलीमुळे देशातील निम्मे एटीएममध्ये बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमात एटीएम मशीनबाबत काही नवे नियम व अटी लागू केल्या आहेत. या कारणामुळे सर्व बँकांना एटीएम मशीनमध्ये काही बदल करावे लागत आहे. हे बदल करण्यासाठी बँकेला आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागत असल्याने, काही बँकांनी एटीएम मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अनेक ठिकाणी बँकांचे एटीएम बंद करण्यात आले आहे. असे असले तरीही, एटीएमद्वारे पैसे काढण्याचे प्रमाण मात्र दिवसेंदिवस वाढत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

मागीलवर्षी देशातील काही महत्त्वाच्या आर्थिक संस्थांनी एटीएम बंद होण्याबाबत अंदाज व्यक्त केला होता. कॉन्फिडेरेशनल ऑफ एटीएम इंडस्ट्रीने (Confederation of ATM Industry (CATMi) या संस्थेने गेल्यावर्षी भारतात 2019 मध्ये अर्ध्यापेक्षा जास्त एटीएम बंद होऊ शकतात असा दावा केला होता. त्यानुसार त्यांनी एक सर्वेक्षण केले, या सर्वेक्षणात देशातील एटीएमची संख्या कमी झाली आहे. देशात एकूण 2 लाख 38 हजार एटीएमची नोंदणी करण्यात आली होती. पण त्यातील जवळपास 1 लाख 13 हजार एटीएम बंद करण्यात आले आहे. असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.

देशात एटीएमद्वारे पैसे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. पण देशात एटीएम मशीनच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. असा दावा आरबीआयने केला आहे. पण आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारताची लोकसंख्या पाहता त्या तुलनेत एटीएमची संख्या फार कमी आहे.दरम्यान देशातील काही महत्त्वाचे एटीएम जर बंद झाले, तर सर्वसामान्यांना पैसे काढण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतील. तसेच या गोष्टीचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होऊ शकतो.

काय आहे आरबीआयचे एटीएमबाबत नवे नियम?
सर्व एटीएममध्ये दरवेळी 100 कोटींपेक्षा जास्त रक्कम असणे गरजेचे आहे.
एटीएममध्ये सीसीटिव्ही, जीपीएस, वायरलेस कम्युनिकेशन आणि हुटर्स असणे बंधनकारक आहे.
सर्व एटीएममध्ये सुरक्षारक्षक असणे आवश्यक आहे.
एटीएममध्ये पैशांची ने आण करणाऱ्या व्हॅनमध्ये दोन सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे.