वृत्तसंस्था
अमेठी, दि. २० – अमेठीतील कारखान्यासाठी दिलेली जमीन राजीव गांधी ट्रस्टने बळकावल्याच्या आरोपावरुन मला काँग्रेसने मानहानीची नोटीस पाठवली असली तरी अशा प्रकारांना मी घाबरणार नाही, हिंमत असेल तर राहुल गांधींनी मला तुरुंगात टाकावे असे आव्हानच केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी दिले आहे. ”मी राहुल गांधी आणि गांधी कुटुंबाविषयी सत्य बोलले. त्यामुळे त्यांनी चिडून मला वकिलामार्फत नोटिस पाठवली. यात त्यांनी वॉर्निंग दिली की, मी गांधी कुटुंबाच्या विरोधात बोलू नये; अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, मी गप्प बसणारी नाही. जनेतसाठी बोलणारच” असे इरानी म्हणाल्या. आज (रविवार) येथे झालेल्या एका सभेत त्या बोलत होत्या. एकाच महिन्याच्या आत अमेठीमध्ये त्यांची ही दुसरी सभा होती.
इरानी यांच्या या व्यक्तव्यावर काँग्रेसचे प्रवक्ता अखिलेश प्रताप सिंग म्हणाले, “खोटे बोलण्याचा आरोप सगळ्यांनाच आहे. मात्र, खोटे आरोप लावण्याचा नाही. इराणी यांनी त्यांच्या गत सभेमध्ये गांधी कुटुंबावर असेच खोटे आरोप केले होते. त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही त्यांना नोटिस दिली आहे”.