सत्ता व पैशाचा भाजपला आलेला माज बिहारी जनतेने उतरवला- उद्धव ठाकरे

0
18
मुंबई, दि. ९– बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ता, पैशांचा वापर मोठ्या प्रमाणात करूनही दारूण पराभव झाला. भाजपला सत्तेनंतर दीड वर्षातच आलेला माज व अहंकार बिहारच्या जनतेने उतरवला आहे. सत्ता- संपत्तीचे वतनदार मोदी-शहा नितीशकुमारांच्या रणनीतीसमोर पाचोळ्यासारखे उडून गेले आहेत. ख-या अर्थाने नितीशकुमार महानायक आहेत अशा शब्दांत शिवसेनेने नितीशकुमारांचे कौतूक केले आहे तर, भाजपच्या पराभवानंतर त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीचे रविवारी निकाल लागले. यात नितीशकुमार-लालूंच्या पक्षाने जोरदार यश मिळवले. भाजपचा पराभव होताच त्यांचा कधीकाळी सर्वात जवळचा मित्र असलेल्या शिवसेनेला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत. शिवसेनेने आपले मुखपत्र सामनात अग्रलेख लिहून नितीशकुमार हे महानायक असल्याचे म्हटले आहे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत बिहार निवडणुकीला या दोघांना जबाबदार धरले आहे. भाजपवर हल्लाबोल करताना शिवसेनेने नितीशकुमार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.