मुंबई- ‘कॉंग्रेस आणि भाजपमध्ये काहीच फरक नाही. भाजप नवनवीन नारे काढत आहे. कधीही कुठेही भारत माता की जय म्हणण्याची काय गरज आहे. तो मुद्दा बाजूला सारा. अगोदर भारताची परिस्थिती सुधारा मगच भारत माता की जय म्हणा’, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.
ते पुढे म्हणाले, ”भारत माता की जय हा नारा मी लहान असताना पहिल्यांदा इंदिरा गांधीच्या तोंडून ऐकला. त्यांचे भाषण संपले की त्या तीन वेळा तो द्यायचे. पण, या घोषणा ठराविक वेळीच द्यायच्या असतात. मात्र, भाजप आता त्यावरून देशक्ती आणि देशद्रोहाचे सर्टिफिकेट वाटत आहे”, असे ते म्हणाले.
शिवसेना सत्तेत राहून मनसेला घाबरत असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेना सरकारविरोधात आहे, असं प्रत्येक वेळी म्हणते, मग सत्तेत का असा सवाल राज ठाकरे यांनी शिवसेनेला केला. तसेच मनसेची गुढीपाडव्याला सभा जाहीर झाल्यानंतर काहींच्या पोटात दुखायला लागले, असा टोलाही शिवसेनेला लगावला आणि जैतापूर आंदोलनाचं काय झालं?, असा खोचक सवाल करत सत्तेत राहून विरोध करण्याचं शिवसेना नाटक करत असल्याची टीकाही राज ठाकरे यांनी यावेळी केली. हजारो लोक मेले, दंगली झाल्या ज्या मुद्द्यावर भाजप सत्तेत आलं. अमित शाहसुद्धा कोर्टातून सुटले, मग राम मंदिर का सुटत नाही? असं म्हणत करत राज ठाकरेंनी भाजपवर शरसंधान केलं. याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भाची मागणी करणा-या मा. गो. वैद्य आणि श्रीहरी अणे यांनाही लक्ष्य केलं.