इतिहास घडला, शनि चौथा-यावर महिलांनी घेतले दर्शन, वाहिले तेल!

0
9
अहमदनगर- गेल्या चार-पाच महिन्यापासून सुरु असलेला शनि शिंगणापूरातील शनि मंदिरातील वाद अखेर आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मिटला. मुंबई हायकोर्टाचे आम्ही पालन करू, तसेच शनि मंदिरात यापुढे कोणालाही प्रवेशबंदी करणार नाही अशी नवी व सामजस्य भूमिका शनि देवस्थान मंदिर विश्वस्तांनी आज जाहीर केली. ट्रस्टी नानासाहेब बनकर यांनी याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी भूमाताच्या महिलांनी शनी चौथा-यावर जाऊन पुष्पहार अर्पण केला व तेलही वाहिले.

चारशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आज शिंगणापुरात खंडित होऊन महिलांना शनिचा चौथरा चढण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. २८ नोव्हेंबर रोजी चौथऱ्यावर प्रवेश केलेल्या अज्ञात तरुणीने खऱ्या अर्थाने हा लढा पेटविला. तिच्या त्या बंडामुळेच स्त्री जगतासाठी आता हा चौथरा खुला झाला आहे.

सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत काही सेकंदात ही तरुणी चौथऱ्यावर गेली होती. त्यानंतर ती तातडीने निघून गेली. देवस्थानच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही बाब कैद झाली होती. तरुणीच्या स्पर्शाने चौथरा अपवित्र झाल्याचे सांगत देवस्थानने या चौथऱ्याचा दुधाने अभिषेक केला. त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी जाहीरपणे महिलांच्या प्रवेशासाठी लढा सुरु केला.

चौथरा प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिला तीनवेळा शिंगणापुरात गेल्या होत्या. मात्र, या तीनही वेळा त्यांना तीव्र विरोधाला सामोरे जावे लागले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांनी केलेल्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने मंदिरात स्त्री-पुरुष असा भेद करता येणार नाही, असा निकाल दिला. मात्र, त्यानंतरही शिंगणापूर देवस्थान चौथरा प्रवेश देण्यास तयार नव्हते. आम्ही पुरुषांनाही चौथऱ्यावर बंदी केली आहे, असे देवस्थान सांगत होते. महिलांनी प्रवेशाची मागणी करु नये, यासाठी पुरुषांनाही चौथरा बंद करण्याची पळवाट देवस्थानने काढली होती. मात्र, देवस्थानच्या या निर्णयामुळे गुढीपाडव्याला कावडींतून गंगाजल घेऊन येणाऱ्या भाविकांनाही प्रवेश बंद झाला. या बाबीमुळे गावातील पुरुष भाविकांच्याही श्रद्धेवर गदा आली. या ग्रामस्थांनी आक्रमक होत चौथरा प्रवेश केल्यामुळे देवस्थानचाही नाईलाज झाला. त्यामुळे अखेर देवस्थानच्या विश्वस्तांना महिलांनाही प्रवेश देण्याची घोषणा करावी लागली.