33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय शिंदे यांच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपचा आक्षेप!

शिंदे यांच्या चार मंत्र्यांच्या समावेशाला भाजपचा आक्षेप!

0
478

blank

मुंबई – महायुती सरकारमध्ये शिवसेनेच्या चार मंत्र्यांचा फेरसमावेश करण्यास भाजपचा आक्षेप असल्याचे समजते. यामुळे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणती भूमिका घेतात, यावर त्या मंत्र्यांचे भवितव्य अवलंबून आहे. मावळत्या मंत्रिमंडळातील संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर या चार मंत्र्यांचा नवीन मंत्रीमंडळात समावेश करण्यास भाजपचा आक्षेप आहे.

या चारही मंत्र्यांच्या कारभारावरून भाजपमध्ये नाराजी आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे या चारही मंत्र्यांची नाराजी पत्करतील का, हा खरा प्रश्न आहे. तानाजी सावंत यांचा कोणत्याही परिस्थितीत मंत्रीमंडळात समावेश झाला पाहिजे, अशी शिंदे यांची भूमिका आहे. सावंत यांना बाहेर ठेवण्यास शिंदे तयार नाहीत. यामुळे मंत्र्यांच्या समावेशावरूनही भाजप आणि शिंदे गटात धुसफूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिंदे यांनी त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांना अजूनपर्यंत नाराज केलेले नाही. भाजपच्या दबावामुळे खासदारकीची उमेदवारी नाकारण्यात आलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेची आमदारकी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले होते.

अब्दुल सत्तार, तानाजी सावंत,संजय राठोड यांना हात लावणे शिंदे यांच्यासाठी तापदायक ठरू शकते. भरत गोगावले यांची मंत्रिपदाची महत्त्वाकांक्षा पूर्ण करायची झाल्यास दिपक केसरकर यांना कदाचित थांबावे लागेल. कारण उदय सामंत आणि दिपक केसरकर हे कोकणातील दोघे मंत्रिपदी असताना भरत गोगावले यांचा समावेश झाल्यास ही संख्या तीन होईल.संजय राठोड यांना बंजारा समाजाचा असलेला पाठिंबा लक्षात घेता त्यांना दूर ठेवणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.

blank