संजय निरुपमांनी दिला काँग्रेस मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा

0
7

मुंबई, दि. 23 – काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला आहे. संजय निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा सोपवला आहे. अंतर्गत गटबाजीमुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचं संजय निरुपम यांनी मान्य केलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी मला हरवण्याच्या नादात पक्षाला पराभूत केले, अशी खंतही निरुपम यांनी व्यक्त केली आहे.
काही जणांनी पक्षाच्या विरोधात उघड काम केले असून, काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष या नात्यानं मी प्रामाणिकपणे काम केले. सर्व नेत्यांनी एकत्र काम केले असते तर पक्षाची कामगिरी चांगली झाली असती, असेही निरुपम म्हणाले. हा माझा वैयक्तिक पराभव नसून पक्षाचा पराभव आहे, हे स्वपक्षीयांच्याच लक्षात आले नाही. असा प्रकार करणारे पक्षाशी निष्ठावान नाहीत. नेत्यांमधील सुंदोपसुंदीचा फटका निकालात बसला आहे, असा दावाही निरुपम यांनी केला.काही मंडळी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या सांगण्यावरून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव माझ्याविरोधात काम करत होते. माध्यमातून माझ्याविरोधात केलेली टीका ही पक्षविरोधी कृती असल्याचे निरुपम म्हणाले.