केंद्र सरकारच्या फसवेगिरीचे तीनवर्ष -प्रेमसागर गणवीर

0
12

भंडाऱ्यात काँग्रेसच्या वतीने आज धरने आंदोलन

भंडारा,दि.२८- शाश्वत विकासाचे फसवे गाजर दाखवून देशभरातील जनतेचा मोदी सरकारने भ्रमनिरास केला आहे. मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल निषेध करण्यासाठी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार दिनांक २९ मे २०१७ ला दुपारी १२ वाजता स्थानिक त्रिमूर्ती चौकात धरने आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे महेंद्र निंबार्ते यांनी कळविले आहे. सरकारचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण चुकीचे ठरत आहेत. देशातील सामाजिक परिस्थिती, दुर्बल घटकांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहेत, उत्तर प्रदेशातील जातीय दंगली, मोदींचे वर्चस्ववादी वर्तन, नोटाबंदीमुळे जनतेला झालेला त्रास इत्यादी मुद्दे हे जनतेचे कर्दनकाळ ठरत आहेत. देशभरातील शेतकरी, कामगार, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थी व युवा वर्ग यांची या सरकारच्या कार्यशैलीवर नाराजगी आहे.

देशातील सर्वसामान्य नागरिकांना भूलथापा देऊन केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले. हे सरकार सत्तेवर येऊन तीन वर्ष झाले आहेत. परंतु, निवडून येण्यापूर्वी मोदी यांनी जनतेला जी आश्वासने दिली, ती आश्वासने पूर्ण होऊ शकलेली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस जनतेला केवळ गाजर दाखविण्याचे काम करीत आहे. शेतकरी रोज आत्महत्या करीत असून महागाई वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा भारतीय जनता पक्षवरील तसेच सरकारवरचा विश्वास उडाला आहे. भाजप सरकार नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या काळात जनता भाजपला धडा शिकवेल, अशी जोरदार टिका भंडारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी केली.उद्या होणाऱ्या धरणे आंदोलनात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सामान्य जनतेने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्हा महिला काँग्रेस, जिल्हा युवक काँग्रेस, जिल्हा एन.एस.यु.आय, काँग्रेस सेवा दलाच्या वतीने करण्यात आले आहे.