स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून पडली बाहेर

0
17

पुणे, दि. 30 –  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारी परिषदेच्या बैठकीत शासनातून बाहेर पडत असल्याचा निर्णय बुधवारी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी पुण्यात जाहीर केला.परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकमताने हा निर्णय घेतला.गेल्या काही महिन्यापासून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि शेट्टी यांच्यात मतभेद निर्माण झाले होते.स्वाभिमानी संघटनेने घेतलेल्या भूमिकेविरोधात सदाभाऊ खोत बोलत असल्याचे दिसून येत होते.त्या पार्श्वभूमीवर खोत यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली होती.समितेने त्यांना संघटनेतून काढून टाकावे असा अहवाल दिला होता.तसेच सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे लवकरच जाहीर केले जाणार होते.त्यानुसार बुधवारी सत्तेतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच येत्या 4 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबताचे लेखी पत्र देणार असल्याचे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.

शेट्टी म्हणाले ,गेल्या चार वर्षापासून शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. महागाई वाढू नये त्यासाठी शेतीमालाच्या किमती वाढू दिल्या नाहीत. केंद्र शासनाने पाकिस्तानकडून कांदा आयात करून नाशिकच्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडल.त्यामुळे प्रश्न पडतो शत्रू पाकिस्तान आहे की शेतकरी आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार या दोन्ही सरकारशी संबंध नसल्याचे जाहीर केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर 4 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत.एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर खा. राजू शेट्टींनी पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. मोदींनी आम्हाला हमीभावाच आश्वासन दिलं होतं, पण ते पाळलं नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

तसेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचा उल्लेख करुन राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ”व्यवस्थेविरोधात लढताना ताकद कमी पडत होती, त्यामुळे भाकरी बदलणे गरजेचे होते. म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेकांची टीकाही सहन करुन तीन वर्ष थांबलो. पण सत्तेचा आमच्या आंदोलनाला काहीही फायदा मिळाला नाही. आमच्या वरच्या साध्या केसेस मागे घेतल्या नाहीत.”विशेष म्हणजे, सदाभाऊ खोत यांच्यावरुन खा. शेट्टी यांनी यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधला. ”ज्याला आम्ही सत्तेत पाठवले, तो आम्हाला आमचा म्हणतच नाही,” अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तसेच शेतकऱ्यांचे आंदोलन आता दिल्लीत नेणार असल्याचं सांगून, राजू शेट्टी पुढे म्हणाले की, ”संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 10 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा जतंरमंतरवर काढणार आहोत.”दरम्यान, सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये स्वभिमानी शेतकरी संघटनेचं सत्तेतील स्थान काय, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शेट्टींनी पत्राद्वारे केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी शेट्टींच्या पत्राला अद्याप उत्तर दिले नाही.