माऊली व तुकोबांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंना अटक करा – अजित पवार

0
19

नागपूर,दि.08 – ”माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता, असे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले. हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी चुकीचे असून महाराष्ट्रातील जनता कदापी खपवून घेणार नाही. यामागील मास्टरमाईंड कोण आहे हे स्पष्ट करावे आणि तरुणांचे विचार भ्रष्ट करण्याचे काम करणाऱ्या संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा”, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ‘माऊली आणि तुकोबाचे विचार सर्व जगाला माहिती आहे. आपण त्यांच्या विचारांसमोर नतमस्तक होतो. पण कोण तरी संभाजी भिडे येतो आणि माऊली-तुकोबांपेक्षा मनू श्रेष्ठ होता असे बेताल वक्तव्य करतो हे योग्य नाही’, असेही अजित पवार म्हणाले.

57 टक्के लोकांना शुद्र मानणारा मनू श्रेष्ठ कसा ? हे आपल्या राज्यात चालणार नाही. यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी. मागच्या वर्षी हे पालखीमध्ये तलवारी घेवून आले होते. यांचा पाठीराखा कोण आहे असा सवालही अजित पवार यांनी केला आहे. त्या व्यक्तीला काय बोलावे कसे बोलावे. एकीकडे सांगितले आंबे खा म्हणजे मुले होतील…त्यांनी पिकवलेले आंबे… आणि काल तर कहरच केला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरमाऊली महाराज यांच्यापेक्षा मनु हा श्रेष्ठ होता या पध्दतीचे वक्तव्य…म्हणजे मनुने काय सांगितले होते. मनुने सर्वांना अतिशय तुच्छ लेखले होते. समाजातील दोन-तीन टक्केच लोक चांगली आहेत असे विचार मनुने सांगितले. तो विचार योग्य नाही हे सांगण्याचे काम महात्मा फुलेंनी केले. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका मांडली आणि ती मनुस्मृती फाडून जाळून टाकली. त्या मनुला हे गोंजारत आहेत हे कसले विचार आणले जात आहेत असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.