अमरावती,दि.01 : मेळघाट हा आदिवासीबहुल प्रांत नवनीत राणा यांचे शक्तिस्थळ मानले जाते. राणा दाम्पत्याने नऊ वर्षे त्या प्रांतात केलेली भावनिक गुंतवणुकीचे धागे उसवणे इतर कुणाही उमेदवारांना जमले नाही; तथापि राणा यांचे टीव्ही हे चिन्ह बदलल्यानंतरची मेळघाटातील ताजी स्थिती अत्यंत विपरीत झाली आहे. नवनीत यांचा जवळचा मेळघाटच त्यांना मतांपासून वंचित ठेवणार असल्याचा अंदाज विश्लेषकांचा आहे. त्यातच राष्ट्रवादी व काँग्रेसने अद्यापही पाहिजे तसा प्रतिसाद दिलेला नाही.त्यामुळेही अडचण निर्माण झाली आहे.राणा दाम्पत्याने मेळघाटात टीव्ही या चिन्हाचा जबरदस्त प्रचार केलेला आहे. आदिवासींना नवनीत राणा अर्थात् टीव्ही असेच समीकरण ठाऊक आहे. धारणी आणि चिखलदरा तालुक्यांतील आदिवासी मतदार शिक्षणापासून वंचित आहेत. लिहिता वाचता येत नसल्यामुळे त्यांना उमेदवारांची नावे वाचता येत नाहीत. प्रसिद्धी माध्यमांतून केलेल्या जाहिरातींचाही त्यामुळे आदिवासी प्रांतातील मतदारांवर प्रभाव पडणार नाही. औरस-चौरस पसरलेल्या मेळघाटात सर्व आदिवासींपर्यंत पोहोचणे आणि बदललेले बोधचिन्ह त्यांच्या स्मृतीत कायम करणे, राजकीय जाणकारांच्या मते अशक्यप्राय बाब आहे. नवनीत राणा यांना मते देऊ इच्छिणाऱ्या आदिवासी मंडळींचीही मते त्यामुळे नवनीत यांना मिळणार नाहीत. सर्वाधिक श्रम केलेल्या आणि सर्वाधिक अपेक्षा असलेल्या प्रांतातून मतप्राप्तीचा हा घसरणारा टक्का इतर कुठल्याही भागातून भरून निघणारा नाही.





