मंत्रीपद देण्यासाठी भाजपाची स्थापना नाही – गडकरी

0
8

कोल्हापूर, दि. २४ – प्रत्येकाला आमदार, खासदार होण्याची इच्छा असून मंत्रीपदासाठी भाजपाची स्थापना झालेली नाही असे खडेबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुनावले आहे. मुख्यमंत्री, मंत्रीपद मिळाले म्हणून आता फूलस्टॉप न लावता जनतेचे जीवनमान बदलण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहनही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केले आहे.

कोल्हापूरमध्ये भाजपाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीचा रविवारी समारोप झाला. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गेल्या ६५ वर्षांत जनतेला काय मिळाल असा सवाल करत नितीन गडकरींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने देशाला गरीबी दिली, तरुण बेरोजगार आहेत असा आरोपही त्यांनी केला.गडकरी म्हणाले, ‘‘काँग्रेसचे सरकार असताना 4.2 टक्के जीडीपी होता. मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून तो 7.5 टक्के झाला आहे. येत्या वर्षभरात यामध्ये आणखी दोन टक्के वाढ होईल. या बैठकीतून कार्यकर्त्यांनी देशाचे भवितव्य आणि इतिहास बदलण्याची प्रेरणा घेऊन जावे. सरकारच्या ज्या योजना आहेत. त्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवाव्यात. जगातील एक नंबरची शक्ती म्हणून भारताला बनवावे.‘‘
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सत्तेवर आलो म्हणजे कार्यकर्त्यांची जबाबदारी संपलेली नाही. आता जबाबदारी वाढली असून जनतेचा आशा अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. येत्या महिनाभरात महामंडळांवर नियुक्ती केली जाईल असे आश्वासनही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. या बैठकीत रावसाहेब दानवे यांनी औपचारीकरित्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.