बचतगटाच्या माध्यमातून महिलांची सक्षमतेकडे वाटचाल

0
15

४६४७२ महिला बचतगटाच्या सदस्य
३८८४ गटांची ८ कोटी ९० लक्षाची बचत
४२ कोटी ७५ लक्ष कर्ज वाटप
गोंदिया दि.९: पूर्वी चूल आणि मुल एवढंच कार्यक्षेत्र असलेल्या महिला आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत. सावित्रीबाई फुलेंचा आदर्श पूढे ठेवून आणि त्यांची प्रेरणा घेऊन अनेक महिला आज यशाची शिखरे गाठत आहे. ग्रामीण भागातील महिलासुध्दा याला अपवाद नाही. अनेक क्षेत्रात ग्रामीण महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.
जिल्हयात महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) ग्रामीण महिलांना गावपातळीवर संघटीत करुन त्यांना बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक बचतीची सवय लावली आहे. माविमचे योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षणामुळे अनेक महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी उद्योग व व्यवसायाची कास धरली आहे. महिलांची संघटनात्मक बांधणी करुन त्यांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाने अर्जुनी/मोरगांव तालुका वगळता उर्वरित सात तालुक्यातील ४१६ गावामध्ये ३८८४ महिला बचतगटांनी स्थापना केली असून यामाध्यमातून ४६ हजार ४७२ महिलांना संघटीत करण्यात आले आहे. या महिलांनी पदरमोड करुन पै-पै जमवून तब्बल ८ कोटी ५८ लक्ष ४० हजार रुपयांची बचत केली आहे. बचतीची सवय आणि अंतर्गत पैशाचे आदान-प्रदान बघता बँकांनी छोट्या विविध प्रकारच्या उद्योग-व्यवसायासाठी तब्बल ४१ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपये कर्ज स्वरुपात बचतगटांना उपलब्ध करुन दिले आहे. उद्योग/व्यवसाय करण्यास बचतगट सक्षम असल्याचा विश्वास मोठ्या प्रमाणात कर्ज देऊन बँकांनी दाखविला आहे.
सात तालुक्यात विशेष घटक योजना-१७७, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना-३५०, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक-११०, स्वयंसिध्दा योजना-४०, तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम-६९३, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान-२११३ असे एकुण ३८८४ महिलांचे बचतगट माविमकडून कार्यरत आहे.
उद्योग-व्यवसायासाठी आतापर्यंत ३१६० बचतगटांनी सन २००२ पासून सप्टेंबर २०१५ पर्यंत ४२ कोटी ७५ लक्ष ३१ हजार ५०० रुपयांचे बँक कर्ज घेतले आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान माविमच्या माध्यमातून तिरोडा आणि सालेकसा तालुक्यात राबविण्यात येत असून य तालुक्यातील ११३९ बचतगटांना प्रति बचतगट १५ हजार रुपये याप्रमाणे १ कोटी ७० लक्ष ८५ हजार रुपये फिरता निधी वाटप केला आहे. या दोन्ही तालुक्यात ४५ ग्रामसंस्थेअंतर्गत २४४ बचतगट सक्षमपणे काम करीत आहे. जिल्हयातील ५७१ महिला बचतगटांना आयसीआयसीआय बँकेने सन २०१५-१६ या वर्षांत सप्टेंबर २०१५ अखेर ५ कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. तसेच जिल्हयातील राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँकानी सप्टेंबर अखेर १२७ गटांना ८२ लक्ष ९५ हजार रुपये कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन दिले असल्याची माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनिल सोसे यांनी दिली.
बचतगटातील महिलांच्या उत्पन्न वाढीसाठी सुक्ष्म उपजिविका आराखडा तयार करण्यात आला आहे. बचतगटाच्या माध्यमातून शेळीपालन प्रकल्प, दुग्ध व्यवसाय, सामुहिक शेती, लाख उत्पादन, स्वस्त धान्य दुकान चालविणे, अंगणवाडयांना आहार पुरवठा करणे, लाकडी नक्षीदार वस्तू तयार करणे, कुक्कूटपालन यासह अन्य उद्योग व्यवसाय जिल्हयातील बचतगटातील महिला करीत आहे. बचतगटामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या नेतृत्व विकासाला चालना मिळाली आहे. बचतगटातून अनेक महिला आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी आहेत. माविमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातून व स्पर्धेतून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळत आहे.