मालेगाव स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञाला दिलासा

0
10
वृत्तसंस्था
मुंबई, दि. १३ –  मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने शुक्रवारी मुंबईतील न्यायालयात दुसरे आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्यावरील मोक्कातंर्गत आरोप हटवले आहेत. यामुळे प्रज्ञा सिंहला मोठा दिलासा मिळाला असून, तिची तुरुंगातून लवकर सुटका होऊ शकते.
 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे झालेल्या स्फोटात 4 जण ठार, 79 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह एकूण जणांना अटक करण्यात आली होती.
स्फोटातील प्रज्ञाचा सहभाग स्पष्ट करणारे ठोस पुरावे मिळाले नसल्याचे एनआयएने मागच्या महिन्यात म्हटले होते.
यापूर्वीच एनआयएने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल पुरोहीत यांच्यावर लावण्यात आलेला मोक्का हटवण्यासंदर्भात कायदा मंत्रालय आणि अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्याकडून मत मागितले होते. केंद्रात सत्ता पालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोपही करण्यात आला होता.
मालेगाव स्फोटाप्रकरणी अटकेत असलेल्या कडव्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्त्यांबद्दल मवाळ धोरण स्वीकारा असा संदेश आपल्याला एनआयएच्या अधिका-याने दिला होता, असा गौप्यस्फोट  याप्रकरणातील विशेष सरकारी वकिल रोहिणी सलियन यांनी काही महिन्यांपूर्वी केला होता. केंद्रात मोदींचं सरकार आल्यानंतरच हा बदल झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.