तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवे पुन्हा बरळले!

0
25

जालना, दि. 10 – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची शेतक-यांबाबत बोलताना जीभ घसरली आहे. एक लाख टन तूर खरेदी केली तरी रडतात ‘साले’, असे म्हणत रावसाहेब दानवेंनी शेतक-यांची एक प्रकारे अवहेलना केली आहे. जालन्यात कार्यकर्ता मेळाव्यात रावसाहेब दानवे बोलत होते. ते म्हणाले इतकी तूर खरेदी करूनही यांचे रडगाणे सुरूच आहे, दर नाही दर नाही असली रडगाणी आता बंद करा, असा इशाराही रावसाहेब दानवेंनी शेतक-यांना दिला आहे. कापूस, तूर आणि डाळीला भाव नाही असली रडगाणी बंद करा, अशी मुक्ताफळे दानवेंनी उधळली आहेत. त्याच वेळी दानवेंनी यांनी शेतक-यांबाबत बोलताना शेलक्या भाषेचा वापर केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिने म्हटले आहे.

भाजपाच्या एका कार्यकर्त्यानं दानवेंना तूर खरेदीबाबत लोकांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न केला असता त्याला प्रत्युत्तर देताना दानवेंची चांगलीच जीभ घसरली आहे. राज्य सरकारने एक लाख टन तूर खरेदी केली तरी लोक रडतात साले, असे म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या कार्यकर्त्यावरच आगपाखड केली आहे. रावसाहेब दानवेंच्या हस्ते पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याआधीही रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत.

दानवेंची वादग्रस्त वक्तव्य :

हजार-पाचशेच्या नोटा असतील तर द्या, मी बदलून देतो : दानवे

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदी केल्यानंतर सर्वाना धक्का बसला. मात्र, तुमच्याकडे नोटा असतील तर द्या माझ्याकडे, मी बदलून देतो आणि आपल्याजवळ कुठे नोटा बंद आहेत?”, असं वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी चिखलीतील सभेत केले.

दुष्काळ नव्हता, तरी ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली

“गेल्या वर्षी अख्ख्या मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळ नव्हता, मात्र आम्ही मुद्दाम फाडून सांगायचो की, खूप दुष्काळ आहे. माणसं स्थलांतर करत आहेत, जनावरं मरत आहेत आणि हे खोटे चित्र उभे आम्ही करत होतो. याचा परिणाम असा झाला की 68 वर्षांत पहिल्यांदा 4200 कोटींची मदत मिळाली.”, असं धक्कादायक वक्तव्य रावसाहेब दानवेंनी केले होते.

”… त्या लक्ष्मीचा स्वीकार करा

पैठणमधील प्रचारसभेत बोलताना रावसाहेब दानवेंनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. “मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते. त्या लक्ष्मीचा स्वीकार करा.”, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होते.

कर्जमाफीनंतर आत्महत्या थांबतील हे लेखी द्या : दानवे

कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावे आणि त्यांनी शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असे अजब वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. ते शिर्डीत बोलत होते.