100 पूल जीर्ण अवस्थेत, कधीही कोसळू शकतात – नितीन गडकरी

0
6

नवी दिल्ली,दि.3(वृत्तसंस्था)- देशभरातील एकूण 100 पूल अत्यंत दयनीय अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या पुलांकडे तात्काळ लक्ष देण्याची गरज असल्याचे लोकसभेत बोलत असताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
आपल्या मंत्रालयाने देशभरातील 1.6 लाख पुलांचं सेफ्टी ऑडिट केले असून, 100 हून अधिक बांधकामं जीर्ण मोडकळीच्या अवस्थेत असल्याचं समोर आले आहे. हे 100 पूल कधीही कोसळण्याची भीती असून, त्यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे असे गडकरी बोलले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना त्यांनी ही माहिती उघड केली.यावेळी नितीन गडकरी यांनी सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेचा उल्लेख केला. सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेला बुधवारी एक वर्ष पूर्ण झालं. गतवर्षी २ ऑगस्टला महाड परिसरात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहून गेला होता. त्यात दोन एसटी बस आणि एक टव्हेरा गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. यात ४२ जणांचा मृत्यू झाला होता.

‘यापुढे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी माझ्या मंत्रालयाने सर्व पुलांची माहिती घेण्यासाठी विशेष प्रोजक्ट लाँच केला होता’, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. रस्ते प्रकल्पाच्या कामांमध्ये होत असलेला उशीर यावर बोलताना गडकरींनी हा उशीर जमीन अधीग्रहण, पर्यावरण मंजुरींमुळे होत असल्याचं सांगितलं.