तंबाखूमुळे अन्नपचनास मदतच होते: खासदार दिलीप गांधी

0
23

अहमदनगर : तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर नव्हे, तर अन्नपचन होते, असा जावईशोध खासदार दिलीप गांधी यांनी लावला आहे. दिलीप गांधी हे भाजपचे अहमदनगरचे खासदार आहेत. दिलीप गांधींच्या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संसदीय समितीचे दिलीप गांधी प्रमुख आहेत. या समितीच्या अहवालातील “तंबाखूमुळे कर्करोग होत नाही‘ या मतावर सर्व स्तरांतून टीका झाली. त्यानंतरही गांधी त्यावर ठाम असल्याचे आज स्पष्ट झाले. “”अर्धवट माहितीवर टिप्पणी करणे चुकीचे आहे. काही समाजसेवक मात्र नसती उठाठेव करतात,‘‘ अशी टीकाही त्यांनी केली.
आढळगाव येथील कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले, “निव्वळ तंबाखू खाल्ल्यामुळे कर्करोग होतो, असा निष्कर्ष अजूनपर्यंत कोणीही, कोठेही काढलेला नाही. मी माझ्या यापूर्वीच्या बोलण्यावर अजूनही ठाम आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलालाही कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. याचा अर्थ तो मुलगाही तंबाखू खातो का? तंबाखू खाण्यामुळे कर्करोग होत नाहीच; उलट अन्नपचन होण्यास मदत होते.‘‘
तंबाखू सेवन आरोग्याला हानिकारक आहे, हे शास्त्रज्ञांनीही सिद्ध केलं आहे आणि लोकांनही मान्य केले आहे. असे सारे असताना अशाप्रकारची विधानं करणे चुकीचे असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे.दरम्यान, भाजप खासदार दिलीप गांधी यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे