लष्करातील ‘पशुबळी’वर मनेका गांधींचा आक्षेप

0
13

नवी दिल्ली – केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री आणि पशुप्रेमी मनेका गांधी यांनी भारतीय लष्करात प्राण्यांचा बळी देण्यावर आक्षेप घेतला आहे. मनेका गांधी यांनी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून ही प्रथा बंद करण्याची विनंती केली आहे. त्याशिवाय त्यांनी हेलिकॉप्टर्समधून पॅराशूटला बांधून प्राण्यांना खाली टाकण्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. सैनिक दुर्गम भागात असतील तर अशा पद्धतीने त्यांच्यासाठी ताज्या मांसाची सोय केली जाते.
भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटमध्ये प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. ब्रिटीश काळात या रेजिमेंटची स्थापना करण्यात आली होती. जगातील तीन देशांमध्ये गोरखा रेजिमेंट आहे. ब्रिटीश लष्कराने हाँगकाँग आणि ब्रुनोई येथे तैनात गोरखा रेजिमेंटला 1973 पासून बळी देण्यास बंदी घातली आहे.नेपाळमधील गोरखा ब्रिगेडला फक्त एकाच प्राण्याचा बळी देण्याची परवानगी आहे. मात्र भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटमध्ये अनेक प्रकारच्या प्राण्यांचा बळी देण्याची प्रथा आहे. त्यांच्या संख्येवर देखील कोणतेही बंधन नाही. गोरखा रेजिमेंट ही प्रथा बंद करण्याच्या बाजूने नाही.