प्रधानमंत्री योजनांचे शनिवारी लोकार्पण

0
9

मुंबई दि. ७- प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या तीन योजनांचे लोकार्पण शनिवारी (9 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या योजनांचा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठाच्या पदवीदान सभागृहात शुभारंभ होणार आहे.
यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे अध्यक्ष एस. के. रॉय, बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एस. मुहनोत उपस्थित राहणार आहेत.
9 मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्याच्या 12 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री विमा सुरक्षा योजना आणि अटल पेन्शन योजना यांचा शुभारंभ केला जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. जिल्ह्यातील अग्रणी बॅंकांच्या माध्यमातून या योजना राबवायच्या आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकांसोबत समन्वय साधून जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करायचे आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करावे, सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्वच घटकातील नागरिकांचा समावेश करून घ्यावा आणि या योजनांसाठीच्या लाभार्थ्यांचे अर्ज 31 मे पर्यंत भरून घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
काय आणि कशी आहे अटल पेन्शन योजना?
अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे. ही योजना मुख्यतः असंघटित क्षेत्रातील नागरिकांसाठी, ज्यांच्यासाठी कुठलीही पेन्शन योजना उपलब्ध नाही, अशासाठी लाभदायक आहे. बँका व पेन्शन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या सहयोगाने ही योजना कार्यान्वित होणार आहे.
18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील सर्व बचत बँक खातेधारक या योजनेत सहभागी होऊ शकतील. 18 वर्षे वयाच्या व्यक्तीने दरमहा 42 रूपये भरल्यास या व्यक्तीला वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर एक हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. याचधर्तीवर दरमहा 210 रूपये भरल्यास पाच हजार रूपये दरमहा पेन्शन मिळू शकेल. दर महिन्याचे योगदान बचत खात्यातून परस्पर नावे टाकण्याची सोय आहे.
या योजनेत ग्राहकाच्या योगदानाबरोबरच पहिली पाच वर्षे (2015-16 ते 2019-20) सरकारचेही योगदान राहणार आहे. हे योगदान ग्राहकाच्या एकूण योगदानाच्या ५० टक्के किंवा एक हजार रूपये यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी असणार आहे. ज्या ग्राहकांसाठी कुठलीही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध नाही आणि जे ग्राहक आयकर दाते नाहीत अशाच ग्राहकांना हे योगदान मिळणार आहे. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नी किंवा पतीस हे पेन्शन चालू राहील. दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांनी नामांकित केलेल्या व्यक्तीस सर्व जमा रक्कम एक रकमी परत करण्यात येणार आहे.