पॅसेंजरचे पाच डबे ‘चंपावती’च्या पुलावर घसरले

0
12

गुवाहाटी दि. २३- आसाममध्ये पश्चिम बंगालच्या अलीपूर द्वारहून गुवाहाटीला जाणार्‍या पॅसेंजर गाडीला शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. पॅसेंजर गाडीचे पाच डबे रुळावरून घसरले. रेल्वे इंजिन पुलाचे लोखंडी कठडे तोडून नदीत कोसळले. या अपघातात रेल्वे चालकासह काही प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चालकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

आसाममधील कोकराझार जिल्हातील सलाकाती आणि बासुगाव स्थानकादरम्यान हा अपघात झाला. आज (शनिवार) सकाळी सिफुंग पॅसेंजर चंपावती नदीच्या पुलावरुन जाताना इं‍जिनसह पाच डबे रुळावरून घसरले. इंजिन नदीत कोसळले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघातात रेल्वे इंजिन आणि नदीवरील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.