जिल्हाधिकाऱ्यांना हटविल्याशिवाय माघार नाहीच,१३५ डॉक्टरांनी दिले राजीनामे

0
671

यवतमाळ,दि.30 :येथील जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या वागणुकीविरोधात डॉक्टरांसह तहसीलदार, मुख्याधिकारी आणि बीडीओ एकवटले असून त्यासाठी मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. तर डॉक्टरांचे राजीनामासत्र सुरूच असून मंगळवारी दुपारपर्यंत १३५ डॉक्टरांनी राजीनामे दिले. जिल्हाधिकारी जोपर्यंत हटणार नाही, तोपर्यंत आंदोलनातून उठणार नसल्याची भूमिका डॉॅॅक्टरांनी घेतली.मंगळवारी आझाद मैदानातून आंदोलनाचे बिगुल फुंकण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वागणुकीविरोधात डॉक्टरांनी प्रचंड आक्रोश नोंदविला. या आंदोलनाला जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बीडीओंसह विविध संघटनांनी पाठींबा दिला. महसूल भवनातून मोर्चा निघाला. आझाद मैदानात समर्थनाचे पत्र डॉक्टरांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी अकारण खालच्या पातळीवर बोलतात. नोकरीवर गदा आणू असे सुनावतात. सर्वांसमक्ष अपमान करतात, असा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात यापूर्वी एसडीओ-तहसीलदारांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. मात्र काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळेच की काय जिल्हाधिकाऱ्यांची वागणूक जैसे थेच राहिली, त्यात किंचितही बदल झाला नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. मंगळवारी अमरावतीच्या विभागीय महसूल आयुक्तांकडे आपली भूमिका व मागण्या मांडण्यासाठी पुन्हा एक शिष्टमंडळ पाठविले गेले. राजीनामा दिलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा आकडा १३५ झाला.यवतमाळातील या कामबंद आंदोलनाचे पडसाद रत्नागिरी, जालना, नांदेड आणि बुलडाणा या जिल्ह्यातही उमटले. दरम्यान मॅग्मो संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड बुधवारी यवतमाळात येत असून ते आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करणार आहे.