गडचिरोली, दि.११: आदिवासींचे आरोग्य सुधारण्यासाठी आय.सी.एम.आर, इतर शासकीय यंञणा व देशातील सेवाभावी संस्थांनी एकञ येऊन काम करण्याची व एकमेकांकडून शिकण्याची गरज आहे. शिवाय आदिवासी आरोग्याबाबत नवनवीन संशोधन होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन देशाच्या आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या(आयसीएमआर) महासंचालिका डॉ.सौम्या स्वामिनाथन यांनी केले.
“सर्च” गडचिरोली येथे ‘आदिवासी आरोग्यासाठी उत्तम उपाय’ या विषयावरील भारत सरकारव्दारा ‘आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन आज डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका लिमातुल्ला यादेन व ‘सर्च’संस्थेचे संचालक तसेच केंद्र सरकारच्या आदिवासी आरोग्य विकास समितीचे अध्यक्ष डॉ. अभय बंग हे मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात कार्यशाळेचा हेतू सांगत आदिवासीं आरोग्य विकासाबाबत महत्वाच्या अडचणी कोणत्या, त्यावरील उपाय व कार्यक्रमाची व्यापक अंमलबजावणी कशी करता येईल, याबाबत डॉ. बंग यांनी मांडणी केली.
स्वातंत्र्याच्या ६० वर्षानंतर भारत सरकारव्दारा आदिवासी आरोग्य विकासाच्या हेतूने होणारी ही पहिली कार्यशाळा आहे.या कार्यशाळेत डॉ. अे.सी. धारीवाल डायरेक्टर जनरल NVBDCP भारत सरकार, म्हैसूर-करूणा संस्थेचे डॉ. सुदर्शन, डॉ. निरू सिंग ICMR वैज्ञानिक, डॉ. रिता रिश्ले, प्राध्यापक एच. बेग टाटा इन्स्टीटयूट ऑफ सोशल सायन्स, पदम खन्ना– NHSRC, डॉ. सतीश कुमारसल्लागार, PHP, NHSRC, इत्यादी सदस्य मुख्यतः मुंबई छत्तीसगड, महाराष्ट्र, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरात, नवी दिल्ली, केरला, ओरिसा, तेलंगणा, आसाम, तामीलनाडू, दिल्ली इत्यादी राज्यातून सहभागी झाले. उदघाटनानंतर आलेल्या चमूव्दारा आदिवासी आरोग्य विकासाच्या विविध प्रयोगाच्या मांडणीला सुरूवात झाली. १३ तारखेला दुपारी ३ वाजता कार्यशाळेची सांगता होणार आहे.