विश्वासावर कर्ज वितरण शासनाचे मोठे पाऊल

0
7

भंडारा दि.२२-: ग्रामीण भागातील लोकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली आहे. या योजनेची विशेष मोहीम राबवून भंडारा व तुमसर येथील ६० लोकांना ३० लाख रुपयांचे कर्ज वितरण खासदार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार, रिझर्व्ह बॅकेचे राव, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, नाबार्डचे महाव्यवस्थापक अरविंद खापर्डे उपस्थित होते.

यावेळी खा. पटोले म्हणाले, प्रधानमंत्री मुद्रा योजना ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली पाहिजे. बँकेच्या व्यवहाराशी तळागाळातील माणुस जोडला पाहिजे. पुर्वी सबसिडीच्या योजनांचा लाभ लोकांना झाला नाही, त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ९ ते १० टक्के व्याजदराने ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण माणूस उभा राहिला पाहिजे. त्यासाठी कर्जदारांनी सुध्दा काळजी घेऊन कर्ज परतफेड केली पाहिजे. कुठलिही हमी न घेता कर्ज देण्याची व्यवस्था शासनाने उभी केली आहे. केवळ विश्वासावर कर्ज देण्यात येत आहे. हे मोठे पाऊल असून या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी कर्जदारांनी घ्यावी, असेही ते म्हणाले.