नागपूर दि १४:– स्वतंत्र विदर्भासाठी जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी केल्याने श्रीहरी अणे काही दिवसांपूर्वी वादात सापडले होते. त्यांच्या या विधानाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला होता. मात्र, अणे यांनी नागपूरात पुन्हा विदर्भावरून वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘विदर्भ स्वतंत्र झाला तर पश्चिम महाराष्ट्राच्या ताटात काहीही उरणार नाही’ असे अणे म्हणाले. नागपूरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
श्रीहरी अणे यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. विदर्भ स्वतंत्र व्हावा की नाही याचे उत्तर केवळ विदर्भातील जनताच देऊ शकते, त्यामुळे याबाबत जनमत चाचणी घ्यावी, अशी मागणी अणे यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी केली होती. त्यांच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटले होते.