२४ जानेवारीला जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान

0
6

ङ्घ स्वच्छतेसाठी लोकचळवळ उभी राहणार

गोंदिया, दि.१४ : जिल्हयाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे घेऊन जाण्यासाठी येत्या २४ जानेवारी रोजी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा नगर परिषद क्षेत्र, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव, देवरी व गोरेगाव या नगर पंचायतीत आणि जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हे अभियान २४ जानेवारी रोजी राबविण्यात येणार असून या अभियानात लोकप्रतिनिधी, सामाजिक यासह सेवाभावी संस्था, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी, एन.सी.सी.चे विद्यार्थी, स्वस्त धान्य दुकानदार, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती या दिवशी श्रमदानातून आपल्या घरी, परिसरात, वार्डात व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेची मोहीम राबविणार आहे.
प्रत्येक वार्डात स्वच्छ भारत अभियानासाठी स्वयंसेवक काम करणार असून ते वार्डात स्वाक्षरी मोहीम राबविणार आहे. माझा वार्ड स्वच्छ करण्यास तयार असल्याची नागरीकांकडून स्वाक्षरीने खात्री करुन घेणार आहे. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गावोगावी अनेक भिंतीवर चित्रकला स्पर्धेचे सुद्घा आयोजन करुन विद्यार्थ्यांना या अभियानात सहभागी करुन घेण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा स्वच्छ करण्यासाठी लोकचळवळ उभी राहणार आहे.