एका वर्षात जिल्हा हागणदारी मुक्त करु – उषा मेंढे

0
7

स्वच्छ भारत अभियान आढावा सभा
गोंदिया,दि.१४ : अनेक आजार हे अस्वच्छता व सार्वजनिक ठिकाणी शौचास बसण्यामुळे पसरतात. रोगराईवर मात करण्यासाठी आणि स्वच्छता निर्माण करण्यासाठी येत्या एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करु असा संकल्प जिल्हा परिषद अध्यक्षा उषा मेंढे यांनी केला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (ता.१४) आयोजित स्वच्छ भारत अभियानांतर्गत सभेत श्रीमती मेंढे बोलत होत्या. यावेळी आमदार विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, राज्याचे स्वच्छतादूत भारत पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, पोलीस उपअधीक्षक(गृह) सुरेश भवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, जिल्ह्यात शौचालयासाठी शासनाचे अनुदान मिळते. प्रत्येक घरी शौचालय उभे झाले पाहिजे यासाठी आज लोकसहभागाची आवश्यकता आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना शौचालय बांधून देण्यात येतात. निर्मलग्राम योजना असतांना अनेक गावे स्वच्छ झाली तेथे शौचालयाची निर्मिती झाली परंतू आता अनेक गावात स्वच्छतेचा अभाव आहे. शौचालये वापरण्यास योग्य नाही. तेव्हा आता त्या लाभार्थ्यांना सुद्धा शौचालय योजनेचा लाभ देण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकप्रतिनिधींनी सुद्धा गावे स्वच्छ व हागणदारी मुक्त करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून श्रीमती मेंढे म्हणाल्या, शासकीय यंत्रणेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्घा या अभियानात मनापासून सहभागी झाले पाहिजे असे सांगितले.
आ.रहांगडाले म्हणाले, ज्या घरी शौचालय नाही त्या कुटुंब प्रमुखाने स्वच्छतेचा संकल्प करुन शौचालय बांधावे. स्वच्छतेमुळे समृद्धी येण्यास मदत होते. प्रत्येकाने संकल्प केला तर जिल्हा स्वच्छतेतून समृद्धीकडे निश्चित जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, स्वच्छतेच्या बाबतीत एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण आहे. २४ जानेवारीला संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वीतेत लोकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेबाबत वातावरण निर्मिती आहे. मात्र शहरी भागात वातावरण निर्मिती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
वार्ड स्वच्छतेसाठी स्वाक्षरी मोहीम राबविणार असल्याचे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवून माझा वार्ड स्वच्छ करण्यास तयार असल्याचे लिहून घेण्यात येईल. प्लॅस्टीक कचरा हा नष्ट होत नसल्यामुळे तो एकत्र करावा. तालुका पातळीवर गटविकास अधिकाऱ्याने सरपंच व सचिवांच्या सभा आयोजित करुन माझे गाव माझा जिल्हा हागणदारीमुक्‍त करु याचा संकल्प करुन त्याबाबतचे नियोजन करावे असेही ते म्हणाले.
श्री. पाटील म्हणाले, स्वच्छता अभियानात कामाचे हात वाढविणे आवश्यक आहे. युवक, महिला, ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, शासकीय यंत्रणा यांचा सहभाग महत्वाचा आहे. तसेच प्रसारमाध्यमांची भुमिका सुद्धा स्वच्छ भारत अभियानात महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
सभेला विविध शासकीय यंत्रणाचे अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी, देवरी, सडक/अर्जुनी, अर्जुनी/मोरगाव व गोरेगाव येथील नगर पंचायतचे अध्यक्ष तसेच सेवाभावी संस्थेचे पुरुषोत्तम मोदी, धर्मिष्ठा सेंगर यांचेसह अनेकांची उपस्थिती होती. उपस्थिताचे आभार श्री.लोणकर यांनी मानले.