गोंदिया – जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात सोमवारपासून हर घर नल से जल उत्सव मोहीम राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेअंतर्गत 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या मोहिमे मध्ये सर्वांनी सहभागी होऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
जल जीवन मिशन हा केंद्र व राज्य शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत 2024 पर्यंत प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणी दारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन मुबलक शुद्ध व शाश्वत पाणी पुरवठा होण्यासाठी जल जीवन मिशन ही योजना केंद्र व राज्य शासनाच्या भागीदारीतून राबविली जात आहे. या योजनेत शंभर टक्के वैयक्तिक व संस्थात्मक नळजोडणी पूर्ण करणाऱ्या गावांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामसभांमध्ये ग्रामपंचायत हर घर जल घोषित करण्याबाबत ठराव घेणे, त्यानंतर गावात समारंभ घेऊन हर घर जल उत्सव साजरा करणे, विद्यार्थ्यांची रॅली काढणे, जनजागृतीसाठी पथनाट्याचे आयोजन करणे, लोककलांचा वापर करून जनजागृती करणे आणि गुणवत्ता तपासणीसाठी विशेष मोहीम राबविणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
हर घर जल उत्सवामध्ये गावातील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, शाळा ,अंगणवाडी ,आरोग्य केंद्र या मधील सर्व घटकांना सहभागी करून घेणे संस्थात्मक नळजोडणी मध्ये ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी आरोग्य केंद्र सार्वजनिक ठिकाणी नळजोडणी देणे इत्यादी उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष तसेच तालुका स्तरावर गट विकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी नरेश भांडारकर, कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी केले आहे.