निष्ठी रेशीम गाव म्हणून नाव लौकिक व्हावा – अनुपकुमार

0
12

भंडारा : टसर रेशीम उत्पादनात जिल्ह्याला 150 वर्षाची पारंपरिक वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. तसेच जिल्ह्यातील निष्ठी, सितेपार, जमनी, किटाळी असे रेशीम केंद्र आहेत. त्यातील रेशीम महाराष्ट्रात विक्रीसाठी आघाडीवर आहे. ही प्रशंसनीय बाब आहे. निष्ठीस रेशीम गाव म्हणून लौकिक मिळविण्यासाठी येथील लाभार्थ्यांनी रेशीम उत्पादनात वाढ करावी. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले. 

संयुक्त वन व्यवस्थापन समिती, कृ‍षि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पवनी तालुक्यातील टसर रेशीम धागा निर्मिती केंद्र, निष्ठी येथे टसर रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी टसर रेशीम लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पवनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीण, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी आदी उपस्थित होते. 

अनुपकुमार म्हणाले, वन विभागातर्फे लाभार्थ्यांसाठी 50 टक्के वन लागवडीसाठी उपलब्ध आहे. त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घेऊन गावात कोष उत्पादन करावे. तसेच उत्पादनाची टक्केवारी वाढवावी. कोष निर्मिती, रिलींग व कापड निर्मिती गावातच झाली तर निश्चितच त्याचा फायदा लाभार्थ्यांना होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासाठी लागणारे सर्व सोयी उपलब्ध करण्यात येतील. 

जिल्ह्यात 50 लाख कोष उत्पादन व्हायला पाहिजे, त्यासाठी लाभार्थ्यांनी प्रयत्नशील रहायला पाहिजे. दिवसेंदिवस वन नष्ट होत आहेत. त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील रेशीम लागवडीत वाढ झाली पाहिजे व जिल्ह्याचे नाव लौकिक रेशीम जिल्हा म्हणून कसे होईल, यावर भर दिला पाहिजे. लाभार्थ्यांनी रेशीम विक्रीसाठी सक्षम बनले पाहिजे तसेच योग्य भाव कसे मिळेल याविषयी प्रयत्नशील राहिले पाहिजे.