कृषीसेवक सरळ सेवा परीक्षा रद्द करा

0
8

भंडारा ,berartimes.com दि.21: कृषी सेवक सरळ सेवा पदभरती परिक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर सुध्दा अन्याय झाल्याचे स्पष्ट दिसून आल्यानंतर पदवीधर महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष पराग भुतांगे व राहुल शामकुंवर यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी चौधरी यांच्या मार्फत निवेदन पाठवून सदर परिक्षा रद्द करुन पुर्नपरिक्षा घ्यावी अश्या प्रकारचे निवेदन देण्यात आले.राज्यात कृषी सेवकांच्या ७३० पदांसाठी परिक्षा ६ आॅगस्ट २०१६ रोजी घेण्यात आली. या परिक्षेत ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी दखल केले होते. त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली या परिक्षेचा निकाल ६ सप्टेंबर २०१६ रोजी जाहिर करण्यात आला.

पंरतु सदर निवड प्रक्रियेमध्ये घोळ आढळून आलेत. विशाल उखा पाटील (अर्ज क्र. १३६६४) हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून ओबीसी प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल १३ मध्ये झाली. हाच विद्यार्थी ठाणे विभागातून (अर्ज क्र. ४८१७) ओबीसी प्रवर्गातून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल ९ मध्ये झाली. पुणे विभागातून हरिश कैलास देवरे व नरेश कैलास देवरे भाऊ उत्तीर्ण झाले. या दोन्ही भावाना १८३ गुण प्राप्त झाले.

विशेष म्हणजे या दोन भावाच्या वयात केवळ सहा महिन्याचे अंतर आहे. औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८७ गुण त्याखालोखाल १८४ गुण प्राप्त केलेले पाच विद्यार्थी, १८३ गुण प्राप्त केलेले सहा विद्यार्थी, १८२ गुण प्राप्त केलेले तीन विद्यार्थी व त्यानंतर थेट १३७ गुण प्राप्त केलेला परिक्षार्थी. कोल्हापुर विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८२ गुण त्याखालोखाल १८१ गुण प्राप्त केलेले चार विद्यार्थी व त्यानंतर थेट १५० गुण प्राप्त केलेला परिक्षार्थी. अमरावती विभागात सर्वसाधारण गटात फक्त १२४ गुणांवर प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. नागपूर विभागात १६५ ते १८२ गुणांच्या दरम्यान १६ मुले आहेत व १४८ ते १६२ गुणांच्या दरम्यान एकही उमेदवार नाही व नंतर थेट १४८ गुणांच्या खाली इतर परिक्षार्थी आहेत.

मेरिट लिस्ट व प्रतिक्षा यादीतील गुणांमध्ये मोठी तफावत आहे. निवड यादीत ओपन प्रवर्गातील पुरुष निवड यादी ९२ गुणांवर तसेच महिला निवड यादी ९१ गुणावंर झाली. याच्या तुलनेत ओबीसी महिला यादी ११३ व ओबीसी पुरुष यादी १२९ गुणांवर अंतिम निवड करण्यात आली. ओबीसी उमेदवारांना जास्त गुण असूनसुध्दा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते व ओपन प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड कमी गुणांवर सुध्दा करण्यात आली. सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत १८६ गुणांचा विद्यार्थी पहिला आला आहे. परंतु प्रश्न पत्रिकेचे अवघड स्वरुप बघता मेरिटचे आकडे संशयास्पद आहेत. करिता सद विद्यार्थ्यांची परिक्षा केंद्रावरील व्हिडीओ रेकॉर्डींग तपासण्यात यावी जेणेकरुन कुणी याना मदत तर करीत किंवा अत्याधुनिक उपकरणाचे वापर तर करीत नाहीत तसेच सदर प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी व त्यात पदवीधर महासंघ भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मत सुध्दा नोंदविण्यात यावे. परीक्षा रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पदवीधर महासंघाचे शहर अध्यक्ष पराग भुतांगे, राहुल शामकुवर, जाबीर मालाधारी, शितल भुरे, प्रवीण अंबादे, सुदेश रामटेके, जितेंद्र मेश्राम, प्रफुल्ल कोटांगले, ब्रजेश खोब्रागडे, मयूर रामटेके, नितीन कांबळे, प्रमोद धुर्वे, रवी समरीत, संदीप वंजारी, प्रफुल्ल भोयर यांनी दिला आहे.