27.4 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home विदर्भ मेडीगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याचे नुकसानच

मेडीगड्डा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्याचे नुकसानच

0
24

सिरोंचा दि.१२ : तालुक्यातील पोचमपल्ली जवळील गोदावरी नदीवर राज्य व तेलंगणा सरकारकडून बांधणाऱ्या मेडीगड्डा – कालेश्वर सिंचन प्रकल्पामुळे तालुक्यातील नऊ गावातील शेतकऱ्यांची सुपीक जमीन नष्ट होणार आहे. प्रकल्पाचे साचलेल्या पाण्यामुळे पोचमपल्ली पासून तर मोक्केला पर्यंत नदीकाठावरील शेतीला धोका पोहचणार आहे. आविस या भागातील शेतकऱ्यांच्या बाजूने व सरकारच्या विरोधात खंबीरपणे उभी राहील, असे प्रतिपादन माजी आमदार दीपक आत्राम यांनी केले.

चिंतारेवला येथील आविस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आविस शाखा सिरोंचा वतीने शुक्रवारी आयोजित मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जि. प. कृषी व पशु संवर्धन सभापती अजय कंकडालवार, जि. प. सदस्य नागेश शानगोंडा, पं. स. सदस्य जोडे राममूर्ती, आविसचे ज्येष्ठ सल्लागार मंदा शंकर, बाजार समिती संचालक व वडधमचे सरपंच आकुला मल्लिकार्जुन, अहेरी पं. स. उपसभापती सोनाली कंकडालवार, जयसुधा जनगाम, आविसचे अध्यक्ष बानाय्या जनगाम, कोटारी दुर्गय्या, अ‍ॅड. तिरुपती कोंडागोरला, तंटामुक्त समिती अध्यक्ष कोटारी धर्मय्या, बाजार समिती संचालक कुम्मरी सडवली , तुमनुरचे सिरंगी लक्ष्मण , गादे सोमय्या, दुर्गम राजान्ना, रवि सल्लमवार, माडेम समय्या, तिरुपती वैशाख , अजय आत्राम, बिरा आत्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.