गोंदिया,दि.२३ : शेतकऱ्यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय चांगल्याप्रकारे करावा. आता केवळ धानावर अवलंबून न राहता शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन नगदी पिकाची कास धरावी. असे आवाहन पालकमंत्री यांनी केले.दवनीवाडा येथे २० फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या वतीने कृषि व पशुपक्षी प्रदर्शन तसेच शेतकरी व पशुपालक मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, कृषि व पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, पं.स.उपसभापती श्री.भक्तवर्ती, पं.स.सदस्य गुड्डू लिल्हारे, वनिता पटले, श्रीमती ठाकरे, दवनीवाडा सरपंच तिजाबाई मस्करे, कृषि विकास अधिकारी वंदना शिंदे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.अनिल गजभिये, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी राजेश वासनिक, गटविकास अधिकारी एस.व्ही.इस्कापे, डॉ.पी.आर.सय्यद, निलकंठ लांजेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार रहांगडाले म्हणाले, शेतीपुरक जोडधंदा म्हणून पशुपालन, शेळीपालन व कुक्कुटपालन हा चांगल्याप्रकारे करता येवू शकतो. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची पोत बिघडली आहे. पण आज शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळताना दिसत आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीची उत्पादकता वाढविली पाहिजे. शेतकऱ्यांनी कोणते पीक घेतले पाहिजे यासाठी कृषी विभागाने शेतीतील मातीचे परीक्षण करावे. कृषि विभागाने योग्य मार्गदर्शन केले तर शेतकऱ्यांना शेती करण्याची दिशा मिळेल. विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी छाया दसरे, डॉ.पुलकुंडवार, डॉ.वासनिक यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित कृषि व प्रदर्शनी, विविध संकरीत गाई, म्हशी, कोंबड्या, शेळी, पशुखादय, विविध प्रकारचे सेंद्रीय खते प्रदर्शनीत लावण्यात आली होती. तसेच विविध शेतकऱ्यांचे भाजीपाला, फळे यांचे स्टॉल, बियाणे, खते कंपन्यांचे स्टॉल या प्रदर्शनात लावण्यात आले होते. या मेळाव्याला दवनीवाडा परिसरातील अनेक गावातील शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वासनिक यांनी केले. संचालन डॉ.महेश राठोड यांनी केले. उपस्थितांचे आभार वंदना शिंदे यांनी मानले.