आजची बालके उद्याचे सृदृढ नागरिक निर्माण व्हावीत- डॉ.पुलकुंडवार

0
22

चाचा नेहरु बाल महोत्सव कार्यक्रम
गोंदिया,दि.२२ : शालेय मुलांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी मुलांना आनंददायी शिक्षण दिले पाहिजे. मुलांचे आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात. त्यासाठी आजची बालके उद्याचे सुदृढ नागरिक निर्माण झाली पाहिजेत असे प्रयत्न करुन काम केले पाहिजे. असे मत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी व्यक्त केले.
२२ मार्च रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय व जिल्हा बाल संरक्षण कक्ष गोंदिया यांच्या संयुक्त वतीने भवभुती रंग मंदिर पुनाटोली गोंदिया येथे आयोजित चाचा नेहरु बाल महोत्सव कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, सहायक कामगार आयुक्त उज्वल लोया, बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ.माधुरी नासरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नम्रता चौधरी, बाल न्याय मंडळाच्या सदस्य आशा ठाकुर व बाल कल्याण समितीच्या सदस्य निता खांडेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.पुलकुंडवार पुढे म्हणाले, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नि:स्वार्थ भावनेने अविरत काम केले पाहिजे. मुलांमध्ये चांगले संस्कार बिंबविण्याचे प्रयत्न करावे. आपणही या समाजाचे एक घटक आहोत अशी आपली वागणूक असायला पाहिजे. समाजामध्ये जे घडते त्याचे अनुकरण लहान मुले करतात, कारण लहान मुले हे अनुकरणप्रिय असतात. सर्वांना सुरक्षीत जगता येईल अशी आपल्या समाजाची भावना असायला पाहिजे. आपल्यामध्ये वंचितांचे भले करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. मुलांवर जास्तीत जास्त प्रेम करावे. अनाथालयामध्ये जे मुले आहेत त्या मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी आपल्या अपत्यासारखे अनाथ मुलांची काळजी घेतली तरच त्या मुलांचा निश्चित विकास होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.मंगेश मोहिते म्हणाले, बालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे हा बाल महोत्सवाचा उद्देश असून मुले ही सुदृढ व निरोगी राहण्यासाठी मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले.उज्वल लोया म्हणाले, बाल महोत्सव कार्यक्रमाच्या आयोजनातून बालकांच्या सुप्त गुणांना वाव मिळत असतो. खेळाच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास होत असतो असे सांगितले.
डॉ.नासरे म्हणाल्या, बाल महोत्सव हा कार्यक्रम दरवर्षी झाला पाहिजे, जेणेकरुन मुलांमध्ये जे सुप्त गुण लपलेले आहेत ते बाहेर आले पाहिजेत. यामुळे मुलांमध्ये स्पर्धेची भावना निर्माण होते. रोज मुलांनी १ तास खेळायला पाहिजे. खेळामुळे बालक सुदृढ व निरोगी राहतो. प्राविण्य मिळविण्यासाठी अथक परिश्रमाची गरज असते, त्यासाठी शिक्षकांनी मुलांमध्ये प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेची भावना रुजवून त्यांना तयार केले पाहिजे. आज बालकांची काळजी व संरक्षणाची गरज असल्यामुळे गोंदिया येथे बालकांचे निरिक्षणगृह असणे गरजेचे आहे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी बाल न्याय मंडळाच्या सदस्य श्रीमती आशा ठाकुर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविकातून श्रीमती नम्रता चौधरी म्हणाल्या, शासकीय व स्वयंसेवी संस्थामधील अनाथ, निराधार, उन्मार्गी तसेच संस्था बाहेरील मुलांमधील सुप्त गुणांना वाव देवून त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी दरवर्षी चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बालकांच्या सुप्त गुणांना वाव देणे हा बाल महोत्सवाचा उद्देश आहे. देशाचे भावी आधारस्तंभ हे बालके आहेत, त्यासाठी बालकांना कायदे व संरक्षणाची आज गरज आहे असेही त्यांनी सांगितले.कार्यक्रमास बाल कल्याण समितीच्या सदस्य निता खांडेकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री.बोंद्रे, बाल कल्याण संरक्षण अधिकारी श्री.बैस, संरक्षण अधिकारी रुपाली सोयाम, माहिला व बालकल्याण विभागाचे परिविक्षा अधिकारी श्री.रामटेके, सरस्वती महिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाघ, शाळेचे संचालक श्री.रोकडे, शिक्षक व विविध शाळेतील विद्याथी-विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होते.संचालन व आभार महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी गजानन गोबाडे यांनी मानले. यावेळी बाल महोत्सव निमित्ताने आयोजित क्रीडा स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले.