अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयावर शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी राष्ट्रवादीचा मोर्चा

0
21

अर्जुनी मोरगाव,दि.23 : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिवार, २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी व सामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे मोर्चा काढण्यात आला. लक्ष्मी भात गिरणी येथून हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने विद्यमान शासनाच्या विरोधात नारे लावून तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात येऊन मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार गावळ यांना देण्यात आले. यावेळी ठोणदार बंडगर उपस्थित होते.
मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे गोंदिया जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, विजय शिवणकर, माजी आ. दिलीप बन्सोड, प्रदेश सदस्य मनोहरराव चंद्रिकापुरे, किशोर तरोणे यांनी केले. शेतकरी व सामान्य माणसाच्या समस्यांची प्रचिती शासनास कळावी व त्या समस्या शासन स्तरावर सोडविण्यात याव्यात. यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मागण्यांमध्ये शेतकर्‍यांचे कर्ज सरसकट माफ करावे, कृषी पंपांना पुरविल्या जाणारे विद्युत भारनियमन बंद करून पूर्ण दाबाची वीज द्यावी, धानपिकाच्या उत्पादन खर्चाच्या अधिक ५0 टक्के हमी भाव देण्यात यावा, स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी तत्काळ लागू कराव्यात, निराधारांच्या विविध योजनांत कुठलाही राजकीय भेद न करता गरजूंना लाभ देण्यात यावा, प्रधानमंत्री आवास योजनेत लाभार्थ्यांची निवड करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गरजूंना लाभ देण्यात यावा, झाशीनगर उपसासिंचन योजना त्वरित कार्यान्वित करून समाविष्ट गावांना त्वरित कृषी सिंचनासाठी पाणी पुरवठा करण्यात यावा, तालुक्यातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्माण व्हावा, याकरिता निमगाव एमआयडीसी पूर्णत: डेव्हलप करून उद्योग उभे करण्यात यावे, वीज कंपनीकडून मागील २ वर्षाच्या काळाच्या चार पटीने वाढविलेले बिल कमी करून ग्राहकांची लुटमार थांबवावी, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील भीषण पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाणी टंचाईचे त्वरित निवारण करावे, घरगुती वापरातील गॅसचे वाढलेले दर कमी करावे, उज्ज्वला योजनांच्या लाभार्थ्यांना विनामूल्य लाभ देऊन त्यांना सबसिडी देण्यात यावी, नवीन शिधापत्रिकाधारकांना अन्न पुरवठा करण्यात यावा, तालुक्यातून जाणारे ग्रामीण मार्ग, जिल्हा मार्ग व राज्य महामार्गाचे बांधकामाची चौकशी करून महामार्गावर होणार्‍या अपघाताची जबाबदारी ही बांधकाम विभागाकडे देण्यात यावी. ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव, नवेगावबांध व प्राथमिक आरोग्य केंद्राचे रिक्त असलेले वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचार्‍यांची पदे त्वरित भरण्यात यावी, अनु.जाती, जमाती व ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवून देण्यात यावी व थकीत शिष्यवृत्ती त्वरित मंजूर करून देण्यात यावी, वनजमिनीचे रेंगाळत असलेले नऊ हजार अतिक्रमण धारकांचे पट्टे त्वरित देण्यात यावे, बंगाली लोकांना जातीचे प्रमाणपत्र व जमिनीचे तथा राहत्या घराचे पट्टे त्वरित देण्यात यावे, ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध व अर्जुनी मोरला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, लघुउद्योग कर्ज माफ करण्यात यावे, एमआरईजीएस योजनेची कुशल व अकुशल कामाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा. या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळी गोवर्धन ताराम, जे.के.काळसर्पे, बंडूभाऊ भेंडारकर, नामदेव डोंगरवार, इंजि.रवी बडोले, हेमकृष्ण संग्रामे, गजानन कोवे, रतीराम राणे, मनोहर शहारे, लोकपाल गहाणे यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.