25 हजार 205 शेतकऱ्यांना 203 कोटी 49 लक्ष रुपये कर्जमाफी

0
12

नागपूर, दि.11 :छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा लाभ नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 25 हजार 205 शेतकरी थकबाकीदार सदस्यांना 203 कोटी 49 लाख 22 हजार रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे. जिल्हयातील शेतकरी सभासद असलेल्या 76.44 टक्के या कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी कृषी कर्ज वाटपासाठीही आघाडी घेवून सर्वाधिक कर्ज उपलब्ध करुन दिले आहे.
शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध व्हावे यादृष्टीने कर्जमाफीची महत्वकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेवून 1 एप्रिल 2009 नंतर कृषी कर्जाचे वाटप झालेले व 30 जून 2016 रोजी थकीत असलेल्या शेतकरी सभासदांची संपूर्ण माहिती एकत्र करुन त्यांना परत कर्ज उपलब्ध व्हावे यादृष्टीने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य प्राधिकृत अधिकारी असून शेतकऱ्यांना सहज व सूलभपणे कर्ज पुरवठा करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या
होत्या त्यानुसार यावर्षी सुमारे पाच हजार शेतकरी सभासदांना सुमारे 30 कोटी रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण केले आहे. शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्हयाचे थकबाकीदार कर्जदारांनाही नव्याने कर्ज पुरवठा करणे बँकेला सूलभ झाले आहे.
शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंत थकबाकी असलेल्या सुमारे 22 हजार 287 शेतकरी सभासदांना 136 कोटी 59 लाख 89 हजार रुपयाचे कर्जमाफी मिळणार असून त्यांचा सातबारा कोरा होत असल्यामुळे नवीन कर्जही उपलब्ध होणार आहे. यामध्ये सरासरी थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी 83.77 टक्के शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच दीड लाखाच्यावर थकीत कर्ज
असलेल्या 2 हजार 918 शेतकऱ्यांना 66 कोटी 89 लाख 33 हजार रुपये कर्जमाफी मिळणार असून त्यासाठी शेतकरी सभासदांना दीड लाखावरील थकीत कर्जाची रक्कम भरावी लागणार आहे. शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दीड लाखावरील थकीत कर्जदार शेतकरी सभासदांनी उर्वरित रक्कम भरुन कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.