दडपशाही झुगारुन काढली शवयात्रा

0
20

यवतमाळ दि.15 : सत्ताधारी राजकीय नेत्यांच्या इशाऱ्यावर पोलिसांनी प्रचंड दडपशाही आणि कार्यकर्त्यांची धरपकड करूनही शेतकरी आंदोलकांनी अखेर सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा काढलीच. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकऱ्यांचे हे आंदोलन यशस्वी झाले.राज्य सरकार दिलेल्या शब्दाला जागले नाही, सरसकट कर्ज माफी न करता अटी-शर्थी लावून काही शेतकऱ्यांची कर्ज माफी केली असे आमदार बच्चू कडू यांचे मत आहे आणि याचाच निषेध करण्यासाठी शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीच्यावतीने फसव्या कर्जमाफी विरुद्ध यवतमाळ जिल्ह्यात शवयात्रा आंदोलन करण्यात आले. जिवंत शेतकऱ्यांच्या १०० प्रतीकात्मक तिरड्या तयार करून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलिसांचा चोख बंदोबस्त असूनही संघटनेने ठिकठिकाणी कार्यकर्ते नेमून पोलिसांना गुंगारा देऊन बच्चू कडूंनी प्रतीकात्मक शवयात्रा काढली.
शासनाने कर्जमाफी जाहीर केली. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती दमडीही पडली नाही. उलट वेगवेगळे व जाचक निकष लावून २०१२ पूर्वीचे थकबाकीदार असलेल्या अर्ध्या अधिक शेतकऱ्यांना या माफीपासून वंचित ठेवले गेले. सरकारची ही घोषणा फसवी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी शुक्रवार १४ जुलै रोजी ‘सरकारची प्रतिकात्मक शवयात्रा’ आंदोलनाची घोषणा केली होती. त्यासाठी जिल्हाभर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. दरम्यान हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी पोलीस व प्रशासनाला हाताशी धरुन पुरेपूर प्रयत्न केले. आंदोलन करा, मात्र शवयात्रा काढू नका, असा प्रस्ताव आंदोलकांपुढे ठेवला गेला. मात्र हा प्रस्ताव झुगारण्यात आला. म्हणून या आंदोलनात सहभागी होऊ शकणाऱ्या संभाव्य कार्यकर्त्यांची रात्रीपासूनच धरपकड सुरू करण्यात आली. पहाटेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात शेतकरी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.पोलिसांनी अखेरपर्यंत तिरडी निघू नये यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची शोधाशोध केली. परंतु पोलिसांची ही दडपशाही झुगारुन गनिमीकाव्याने आधी उमरसरा व नंतर येथील जयहिंद चौकात सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. त्यामुळे पोलिसांचे प्रयत्न फेल ठरले.
दरम्यान अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे प्रहार युवा शक्ती संघटनेचे अपक्ष आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू चक्क मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसने यवतमाळ बसस्थानकावर पोहोचले. तेथून दुचाकीने त्यांनी शासकीय विश्रामगृह गाठले. शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे, आंदोलनाचे निमंत्रक देवानंद पवार आदी तेथे पोहोचले होते. कार्यकर्त्यांचीही तेथे प्रचंड गर्दी झाली. यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शवयात्रा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे तिरडी व साहित्य जप्त करण्यात आले. त्यानंतरही कार्यकर्त्यांनी शवयात्रेचा निर्धार कायम ठेवत चौघांनी एका कार्यकर्त्याला प्रेतयात्रेसारखे उचलून काही अंतर चालले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना नेत्यांनी युती सरकार, जिल्हा प्रशासन, आंदोलनाला विरोध करणाऱ्या काँग्रेसचे वयोवृद्ध नेते, वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख, पोलीस आदींचा खरपूस समाचार घेतला. या आंदोलनासाठी यवतमाळ शहर व जिल्हाभरात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनामध्ये आमदार बच्चू कडू, माजी आमदार वामनराव चटप, चंद्रकांत वानखडे, शेतकरी संघटनेचे विजय विल्हेकर, गजानन अहमदाबादकर, माजी आमदार विजयाताई धोटे, वामनराव कासावार, राहुल ठाकरे, प्रवीण देशमुख, वसंत घुईखेडकर, मनीष पाटील, प्रफुल्ल मानकर, बाजार समिती सभापती रवींद्र ढोक, स्वामिनीचे महेश पवार, मनिषा काटे आदी सहभागी झाले होते.