शेतकऱ्याला स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील- राजकुमार बडोले

0
13
????????????????????????????????????

शेतकरी कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप
गोंदिया,दि.१८ : राज्य शासनाने देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांचे दीड लाख रुपये पर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. एकीकडे शेतकरी हा कर्जमुक्त होत असतांना आता तो शेतीवर पूर्णपणे स्वावलंबी कसा होईल या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
आज १८ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, गोंदिया नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा उपनिबंधक संदिप जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री बडोले म्हणाले, राज्यातील ९० लाख शेतकऱ्यांचा सातबारा या योजनेमुळे कोरा होणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील ८२ हजार २२६ शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहे. १५ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होणार आहे. आजपर्यंत राज्यात झालेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत नव्हता अशी ओरड होती, परंतू या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तुलनेत आपल्याकडील शेतकरी कमी प्रमाणात कर्ज घेत असल्याचे सांगून श्री.बडोले म्हणाले की, आपल्याकडील शेतकऱ्यांची कर्जाची रक्कमही कमी असते. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. धान उत्पादक शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे हे मला मनापासून वाटते. घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकऱ्यांनी वेळीच केली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी काळे म्हणाले, पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसा आरटीजीएसद्वारे जमा होणार आहे. जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरले. अर्ज भरतांना शेतकऱ्यांना अनेक अडचणी आल्या. या अडचणींवर मात करुनसुध्दा त्यांनी ऑनलाईन अर्ज भरले.
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची असतांना देखील शेतकऱ्यांनी त्या अडचणीतून मार्ग काढल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, लाखो संख्येने शेतकरी हे ऑनलाईन अर्ज भरतात यावरुन शासनाची ऑनलाईन प्रक्रियेची दिशा योग्य असल्याचे दिसून येते. या योजनेचे महत्व शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या माणिकलाल लिल्हारे, निलेश धुर्वे, चिंतामन बिसेन, मंगरु रहांगडाले, अंजनाबाई बिसेन, लखनलाल कटरे, केसरबाई चुटे, पुर्णाबाई मानकर, मंगला ऊके, जाईबाई बोरकुटे, गिताबाई कुमरे, भैय्यालाल बिसेन, नकुल नेताम, मोहन नेताम, कौशल्या कुंभरे, हिवराज राऊत, समला कुमरे, सायजा उईके, सुगंधा मडावी, सुखदेव कोरे, सिताराम शेवता, उमाबाई सलामे या शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी असलेले छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे कर्जमाफीचे प्रमाणपत्र तसेच महिला शेतकऱ्यांना साडी-चोळी देवून सत्कार करण्यात आला. उपस्थित काही शेतकऱ्यांनी योजनेबाबत आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने रेखलाल टेंभरे, विरेंद्र जायस्वाल, प्रदिप ठाकुर, धनंजय वैद्य यांचेसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील शेतकरी बांधव व पात्र शेतकरी लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्री.आटे, सहायक निबंधक सर्वश्री अनिल गोस्वामी, प्रमोद हुमने, नानासाहेब कदम, श्री.भानारकर, सहायक सहकार अधिकारी श्रीमती बोरकर, श्रीमती खाडे, श्री.मेश्राम, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती मारवाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार सहायक निबंधक देविदास घोडीचोर यांनी मानले.