पुरातन वृक्षाच्या संरक्षणात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान- राजकुमार बडोले

0
39

वृक्ष संरक्षण योजनेअंतर्गत धनादेश वाटप
गोंदिया,दि.४ : आज पर्यावरणाचा असमतोल निर्माण झाला आहे. त्याचे परिणाम जीवनसृष्टीवर होत आहे. बदलत्या वातावरणामुळे वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे काळाची गरज आहे. हजारो वर्षापासून असलेली जंगले वाचविण्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
वन आगार नवेगावबांध येथील सभागृहात ३ नोव्हेंबर रोजी वन विभागाच्या वतीने वृक्ष संरक्षण योजना सन २०१७-१८ अंतर्गत १०० वर्ष जुन्या वृक्षांचे संरक्षण केल्याबद्दल शेतकऱ्यांना धनादेश वाटप करतांना आयोजित कार्यक्रमात श्री.बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे यांची विशेष उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून उपवनसंरक्षक एस.युवराज, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य मंदा कुमरे, पं.स.सदस्य सर्वश्री होमराज कोरेटी, रामलाल मुंगनकर, प्रेमलाल गेडाम, श्रीमती अर्चना राऊत, तहसिलदार देवदास बोंबार्डे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, तालुका कृषि अधिकारी श्री.तुमडाम, नवेगावबांधचे सरपंच अनिरुध्द शहारे, रघुनाथ लांजेवार, डॉ.डोंगरवार यांची उपस्थिती होती.
श्री.बडोले म्हणाले, पूर्व विदर्भाच्या एकूण भागापैकी ३५ टक्के भाग हा जंगलव्याप्त आहे. त्या तुलनेत उर्वरित महाराष्ट्रात जंगलाचे प्रमाण कमी आहे. अनेक वर्षापासून आपल्याकडून वृक्षांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात १०० से.मी. गोलाईचे वृक्ष आहे त्यांना सुध्दा या योजनेअंतर्गत मदत मिळाली पाहिजे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी वृक्ष संवर्धनाच्या कामात पुढाकार घेतील. आज निसर्ग वाचविण्यात सर्वांच्याच सहकार्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
जुन्या वृक्ष संरक्षणासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करणारी राज्यातील गोंदिया नियोजन समिती ही एकमेव असल्याचे सांगून श्री.काळे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांकडे १०० वर्षापेक्षा जूने वृक्ष आहेत त्या वृक्षाचे संरक्षण प्रत्येक शेतकऱ्याने करावे. अशा वृक्षांची नोंद तलाठ्यामार्फत सातबारात करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी नवेगावबांध, गोठणगाव व अर्जुनी/मोरगाव वनपरिक्षेत्रातील १५१ शेतकऱ्यांना शंभर वर्षापासूनची त्यांच्या शेतातील १५० से.मी. गोलाईच्यावरील झाडांचे संरक्षण केल्याबद्दल प्रति वृक्ष १००० रुपये याप्रमाणे मंसाराम मडावी, सीताराम कुंभरे, मोहन कुंभरे, सीताराम मडावी, मधुकर करचाल, संध्या कराडे, केवळराम कोरामी, दिनानाथ बाळबुध्दे, मनोहर पुस्तोडे, शांतीप्रकाश बोरकर, मुरारी नेवारे, दिनेश फुल्लूके यांना व अन्य शेतकऱ्यांना धनादेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार नवेगावबांधचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए.एम.खान यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.