तुरीला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक

0
22

वाशिम,दि.1 :  जिल्ह्यातील व्यापारी अत्यंत कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांचे नुकसान करीत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासह जिल्हा उपनिबंधकांनाही निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्यावतीने निवेदन सादर करुन जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर सोमवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यंदा शासनाने तुरीला बोनस मिळून ५४०० रुपये हमीभाव जाहीर केला असतानाही व्यापारी तुरीची खरेदी त्यापेक्षा खूप कमी दराने करीत आहेत. शेतकरी आधीच विविध नैसर्गिक संकटांनी बेजार झाला असताना बाजार व्यवस्थेकडून त्याची पिळवणुक होत आहे. याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालय मात्र काहीच बोलायला तयार नाही, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले, तसेच व्यापाऱ्यां वर गुन्हे दाखल करण्यासह जिल्हा उपनिबंधकांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यां ची पिळवणूक थांबविण्यासाठी नाफेडमार्फत तुरीची खरेदी सुरू करून यापूर्वी तूर विक्रीमुळे झालेले नुकसानही त्वरीत भरून देण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.