सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये

0
23

पुणे,दि.1 :माळी समाजाच्या मागण्यांकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत असल्यामुळे सामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. सरकारने माळी समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये. नागरिक रस्त्यावर उतरल्यास सरकारला पळता भुई थोडी होईल, असा सज्जड इशारा माळी समाजाच्या महारॅलीतून देण्यात आला.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. हा दिवस यंदाही फुले दांपत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी रॅलीत सहभागी मान्यवरांनी हा इशारा दिला. या रॅलीत क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले फोरमचेचेअरमन अविनाश ठाकरे, महारॅलीचे राज्य संयोजक राजेंद्र गिरमे, पुणे जिल्हा संयोजक अश्विन गिरमे,समर्थ परिवराचे जगन्नाथ लडकत, माजी आमदार दीप्ती चवधरी, महात्मा फुले वसतिगृहाचे अध्यक्ष दीपक जगताप, माजी आमदार कमलताई ढोले-पाटील, माजी महापौर विठ्ठलराव लडकत आदी मान्यवर उपस्थित होते. या महारॅलीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून माळी समाजातील बंधू-भगिनी, समविचारी व्यक्ती, कार्यकर्ते आणि फुले विचार प्रचारक-प्रसारक अशा हजारो समविचारी व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.
भिडे वाडा येथे सुरू झालेल्या या महारॅलीत सजवलेले रथ, लेझीम आणि ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक हाती घेऊन माळी समाज बांधव सहभागी झाले होते. भिडे वाडा येथून या  महारॅलीचा प्रारंभ झाला. दगडूशेठ गणपती मंदिर, शिवाजी रस्ता, मंडई चौक, पानघटी चौक, गंजपेठ पोलीस चौकी चौक, मार्गे महाराणा प्रताप रस्त्यावरुन फुले वाड्याकडे या रॅलीचे भव्य सभेत रुपांतर झाले. यावेळी माळी समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्या मांडण्यात आल्या. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक करावे, महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्तपणे भारतरत्न पुरस्कार द्यावा, महात्मा फुलेंचे समग्र साहित्य पुन:प्रकाशीत करावे, ओबीसींची जनगणना घोषित करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.  या महारॅलीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड आणि माळी नगरमधील विविध समविचारी संस्था-संघटना सहभागी झाल्या होत्या.