नक्षल्यांच्या विनाशातून विकास शक्य-मेश्राम

0
10

आलापल्ली,दि.05 : गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेत नक्षलवादी अडथळा आणत आहेत. हिंसक व घातपाताच्या कारवाया घडवून सर्वसामान्य नागरिकांचे जीवन कठीण करण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांकडून सातत्याने होतो. यावर एकमेव उपाय म्हणजे नक्षलवाद्यांचा विनाश हा आहे. नक्षल्यांच्या विनाशातूनच जनतेचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन कसनसूर उपपोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस.एम. मेश्राम यांनी केले.
तालुक्यातील कसनसूर उपपोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेनासर येथे सोमवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कसनसूरचे सरपंच सुनील मडावी, ग्रा.पं. सदस्य नरोटे, मुख्याध्यापक वैरागडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिकाटे, सहायक पोलीस निरीक्षक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक संसारे, मोरे, डाके, गिरीगोवासी, अरोंदीकर आदी मान्यव उपस्थित होते.
या मेळाव्यात आरोग्य, महावितरण, वन व कृषी विभागाच्या वतीने स्टॉल लावून उपस्थित नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच सदर मेळाव्यादरम्यान विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये महिलांसाठी रांगोळी व नृत्य स्पर्धा घेण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. गावातील गरजू व्यक्तींना पोलीस विभागातर्फे विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कसनसूर उपपोलीस ठाण्याचे मेजर आपटे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मेळाव्याला बिनासर व परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. वाटपाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सामूहिक भोजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.