संजयनगरवासीयांना पट्टे मिळवून देणार

0
9

गोंदिया,दि.12 : संजयनगरात राहत असलेले नागरिक अतिक्रमणकर्ते म्हटले जाऊ नये, त्यांनाही सन्मानपूर्वक येथे रहावे यासाठी त्यांना त्यांच्या जागेचे स्थायी पट्टे मिळवून देणे आपले ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा व प्रयत्न सुरू असून आता पट्टे मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या संजयनगर येथील आमसभेत नागरिकांनी परिसर झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करून येथील रहिवाशी नागरिकांना स्थायी पट्टे देण्याचा ठराव एकमताने घेण्यात आला. जवळपास ६०० नागरिकांना भविष्यात याचा फायदा होणार आहे.सभेला नगराध्यक्ष अशोक इंगळे, नगरसेविका दिपीका रूसे, नगरसेवक भागवत मेश्राम, सुनील तिवारी, तहसीलदार मेश्राम, अनिल डोंगरे, बिट्टू खान, साजन गजभिये, नितीन डोंगरे, अजय मोरे, मनिष रामटेके, आकाश मिश्रा, भिमदास उके, उत्तम भुजाडे, संजय गवळी, सुभान मौलाना, घनश्याम बावनथडे, अनिल बांगडे, सुशांत बंसोड, निळाजी चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
शहरातील संजयनगर परिसरातीलरिवासी नागरिकांना स्थायी पट्टे देण्यात यावे या विषयाला घेऊन सोमवारी (दि.९) घेण्यात आलेल्या शहरात प्रथमच आयोजित आमसभेत ते बोलत होते. आमदार अग्रवाल म्हणाले, येथील नागरिकांच्या पट्ट्यांच्या विषयात सर्वच संबंधीत अधिकारी व शासकीय विभागांनी आपापल्या प्रकारे अडचणी उभ्या केल्या. पट्टे मिळावे या आदेशावर विविध प्रकारचे नियम लावून अडविले. मात्र आम्ही प्रयत्न सोडलेले नाहीत. हा परिसर झुडपी जंगल कायद्यातून मुक्त करण्याचा ठराव घेतल्यानंतर प्रस्ताव राज्य शासनाकडे व तेथून केंद्र शासनाला पाठविला जाईल. केंद्र शासनाकडून हा परिसर झुडपी जंगल क्षेत्रातून मुक्त करण्याची मंजुरी आम्ही निश्चितच आणणार. त्यानंतर राज्य शासनाकडून परिसरातील नागरिकांना स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही आमदार अग्रवाल यांनी सांगीतले.
याप्रसंगी सामाजीक कार्यकर्ता देवा रूसे यांनी, संजयनगरवासीयांना स्थायी पट्टे मिळावे यासाठी आमदार अग्रवाल कित्येक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. यासाठी घरांचे नकाशे तयार करुन स्थायी पट्टे देण्याची कारवाही सुरू असल्याचे सांगीतले. प्रास्तावीक नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी केले.