चंद्रपूर,गडचिरोली व यवतमाळ जिल्हयातील रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा:हंसराज अहीर

0
14

नवी दिल्ली,दि.20 : महाराष्ट्रातील चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हयांतील महामार्गांसह ६ हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली असून, या कामांना  गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन भवन येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा चंद्रपूरचे खासदार हंसराज अहीर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर,गडचिरोली आणि यवतमाळ जिल्हयातील रस्ते विकास कामांची आढावा बैठक झाली.

या बैठकीत तिनही जिल्हयांतील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत बांधण्यात येणारे ८ महामार्ग, ‘अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम(ईपीसी) कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येणारे ९ रस्ते आणि  केंद्रीय रस्ते निधीतून करण्यात येणाऱ्या २२ कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी रस्ते विकास कामांसंदर्भातील विविध मंजुरी देण्यात आल्या. तसेच, या कामांसाठी आवश्यक असणारी वन विभागाची मंजुरी व रस्ते बांधकामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे श्री. अहीर यांनी यावेळी सांगितले.

प्राणहिता नदीवरील पुलाच्या कामाचे पुढील महिन्यांत उद्घाटन

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हयाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा व या भागात विविध विकास कामांना पूरक ठरणाऱ्‍या  प्राणहिता नदीवरील पुलाचे बांधकाम पूर्ण होत आले आहे, यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. पुढील महिन्यात या पुलाचे उद्घाटन करण्याबाबतही एकमत झाल्याचे श्री. अहीर म्हणाले. या पुलामुळे छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्र या तिनही राज्यांतील नक्षलग्रस्त भाग जोडला जाणार आहे. तसेच, गडचिरोली भागातील नक्षली हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी व या राज्यांतील दळण-वळणासाठीही मोठी मदत होणार असल्याचे श्री. अहीर म्हणाले. यासह तिनही जिल्हयांतील रस्त्यांची विकास कामे अंतिम टप्प्यात असून येत्या तीन महिन्यात विविध कामांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वर्धा नदीवर बंधारा व पुलाचा प्रायोगिक प्रकल्प  

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्यावतीने वणी ते वरोरा महामार्गादरम्यान वर्धा नदीवर बंधारा व पुल बांधण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या संदर्भातही आज चर्चा झाली. या पुलाच्या माध्यमातून वाहतूक व जलसंधारणाचे उत्तम कार्य होऊ शकते व हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर भागांमध्ये याचे अनुकरण करण्यात येईल, असेही एकमताने ठरले.   या ८ महामार्गांचा घेण्यात आला आढावा

आजच्या बैठकीत महागाव ते यवतमाळ हा ३६१ क्रमांकाचा व ७८ कि.मी.लांबीचा महामार्ग, वणी ते वरोरा हा ९३० क्रमांकाचा १८ कि.मी. यवतमाळ ते वर्धा हा ३६ क्रमांकाचा ७० कि.मी.,नागपूर ते हैद्राबाद हा ७ क्रमांकाचा २२ कि.मी., ब्राह्मणी-राजुरा-वरुड- देवरापूर हा ३० कि.मी, राजुरा-कोरपना-आदिलाबाद हा ५७ कि.मी.आणि वर्धा- बुटीबोरी या ५९ कि.मी. लांबीच्या मार्गाचा आढावा घेण्यात आला.

ईपीसी अंतर्गत ९ रस्ते विकास कामांचा आढावा

अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (ईपीसी) कार्यक्रमांतर्गत चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ जिल्हयात बांधण्यात येणाऱ्या ९ रस्ते विकास कामांचा आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यात नागभीड- आरमोरी (३९ कि.मी.), प्राणहिता पुल (१६८ कोटी खर्च), गडचिरोली –मुल ( ४१ कि.मी.), चिमूर-वरोरा (४२कि.मी.), मालेवाडा-चिमूर(३१ कि.मी.),मूल-चंद्रपूर(३९ कि.मी.), बामनी –नवेगाव(४२ कि.मी.) दिग्रस-दारव्हा-कारंजा (७४ कि.मी.) आणि आर्णी ते नायगावबंदी  ( ४५ कि.मी.) या रस्ते विकास कामांचा समावेश आहे.

केंद्रीय रस्ते निधीतून करण्यात येणाऱ्‍या २२ कामांचा आढावा

चंद्रपूर शहारात ३५० कोटींच्या खर्चातून  बांधण्यात येणाऱ्‍या उड्डाण पुलासह अन्य १० कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच यवतमाळ व चंद्रूपूर जिल्हयातील घाटंजी-पारवा(३५ कोटी),बोटी-पाळा-मुकुटवर (४९ कोटी ), पारवा-पिंपडखुटी(८० कोटी) आदीं कामांचा आढावा घेण्यात आला.