स्वच्छता अभियानाचे वाजले तीन तेरा

0
61
◆ स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी
मोहाडी,(नितीन लिल्हारे),दि.25ः-: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम अभियान सुरु करण्यात आले. पारितोषिक मिळविण्याच्या उद्देशाने का होईना ग्रामीण भागातील गावे स्वच्छ व सुंदर बनली होती. मात्र विद्यमान माणसांना, लोकप्रतिनिधी, शासन- प्रशासन व सरपंचांना  स्वच्छ भारत अभियानाचा पुरता विसर पडला आहे.
मोहाडी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीच्या गावामध्ये जागोजागी अस्वच्छता दिसून येत आहे. सालई खुर्द परिसरा बरोबर टाकला, काटेबाम्हणी,उसर्रा, विहिरगाव,अकोला, डोंगरगाव, भिकारखेडा, टांगा, ताळगाव, धोप, मलदा, सकरला, शिवणी, आंधळगाव  आदी गावात सर्वत्र घाणच घाण दिसून येत आहे. गावातील नागरिकांनी घरातील सांडपाणी शोचखड्डे तयार करून साठवायचे असते. मात्र कुणाचीही तमा न बाळगता तो वर्दळीच्या रस्त्यावर टाकले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात स्वच्छ भारत अभियानाचा पुरता फज्जा उडाला आहे. हातात झाडू घेऊन केवळ फोटो काढण्यापुरतेच स्वच्छता अभियान राबविल्याचे दिसून येत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी संत गाडगेबाबा या महापुरुषांच्या नावाने सुरु केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानाचा आता अनेक गावांना विसर पडलेला दिसून येत आहे.
शौचालय बांधले, मात्र वापरावर प्रश्नचिन्ह  मोहाडी पंचायत समिती अंतर्गत ७५ ग्रामपंचायतीचा समावेश असून १०८ गावांचा समावेश आहे. या गावामध्ये स्वच्छ भारत अभियान १०० टक्के राबविण्याचे प्रमाणपत्र सर्व ग्रामपंचायतीला देण्यात आले. स्वच्छता अभियान राबविण्याच्या वेळेस वेगवेगळ्या अँगलमध्ये फोटो काढून कांगावा करण्यात आला. त्यानंतर या अभियानाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या अभियानाचा फज्जा उडाला. ग्रामपंचायतीच्या देखरेखीखाली वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. मात्र बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर होत आहे का? याची प्रत्यक्ष तपासणी झाल्याचे दिसून येत नाही. ग्रामीण भागात अजूनही उघड्यावर शौचास जाण्याचा प्रकार दिसून येत आहे. अनेकांनी शौचालयांना स्नानघर बनविले आहे.
शासनाने रोगराईवर आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे, याचे विविध योजनेतून प्रबोधनातून बाळकडू पाजले. व तसे निर्देशही दिले. पण येथील समाजमन स्वच्छतेविषयी जागृत नाही. म्हणून प्रशासनाने राबविलेला स्वच्छता अभियान केवळ कागदावरच असल्याचे चित्र भेजगाव परिसरात पहावयास मिळत आहे.   स्वच्छता ही सर्वांचीच जबाबदारी आहे. हे येथील समाजमन मानायला तयार नाही. घरातील कचरा रस्त्यावर फेकण्याची सवय अजूनही नागरिकांची गेली नाही. म्हणून कचरा वाढत आहे. गावेच्या गावे कचरामय होताना दिसत आहेत. स्वच्छ भारत मिशनमुळे स्वच्छतेची जाणीव प्रत्येकाला व्हायला पाहिजे होती. मात्र ती अद्यापही झालेली नाही. यामुळे आजघडीला स्वच्छता टिकवून ठेवणे लोकांना जमले नाही. परिणामी या योजनेचा फज्जा उडाल्याची चित्र दिसून येत आहे.