यवतमाळ,दि.10 : इतर मागासवर्गावर (ओबीसी) होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित ओबीसी आरक्षण बचाव समितीने सोमवारी भरपावसात जिल्हा कचेरीवर धडक दिली. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. स्थानिक तिरंगा चौकात पावसातच सभा घेण्यात आली.भरपावसात निघालेल्या या मोर्चाने यवतमाळकरांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चेकरी छत्र्या घेऊन आणि रेनकोट घालून या मोर्चात सहभागी झाले होते. भरपावसातही घोषणांनी परिसर दणाणला होता. पावसाची तमा न बाळगता या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
एमबीबीएसच्या प्रवेश प्रक्रियेत ओबीसीचे २७ टक्के आरक्षण रद्द करून दोन टक्क्यावर आणले आहे. यामुळे ओबीसींच्या गुणवंत विद्यार्थ्यांना यंदा प्रवेशाची संधी मिळाली नाही. ओबीसींना प्रगतीपासून रोखण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. स्वातंत्र्यापासून ओबीसीची जातनिहाय जनगणनाच झाली नाही. त्यामुळे ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसींना लावलेली असंवैधानिक क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी आणि शेतकरी, शेतमजुरांना पेंशन देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
स्थानिक महात्मा फुले चौकातून निघालेला हा मोर्चा शहरातील विविध भागाने मार्गक्रमण करीत तिरंगा चौकात पोहोचला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. मोर्चाचे नेतृत्व प्रदीप वादाफळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, डॉ.दिलीप घावडे, डॉ. दिलीप महाले, अॅड. राजेंद्र महाडोळे, उत्तम गुल्हाने, नानाभाऊ गाडबैले, अरुण राऊत, दिनेश गोगरकर, डॉ.ज्ञानेश्वर गोरे, लक्ष्मीकांत लोळगे, राजू देशमुख, दीपक वाघ, संजय लडके, विठ्ठल नागतोडे, प्रकाश फेंडर, राजू देशमुख, अमन निर्बान, रमेश गिरोलकर, जितेंद्र हिंगासपुरे यांनी केले. या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.