शासनाच्या योजना समाज परिवर्तन घडविण्यासाठी : ना. बडोले

0
16

गोंदिया,दि.२९ः- चर्मकार समाजाचा मुळ उद्योग हातातून निसटला व तो ‘टाटा-बाटा’ सारख्या उद्योगपतींनी अंगिकारुन व्यवसाय केला. आज चर्मकार समाज विकासाच्या प्रवाहातून पुढे यावे यासाठी शासन मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना राबवित आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ तसेच राज्यातील संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजना सुरु आहेत. या योजनांच्या माध्यमातून अनेकांनी आपले व्यवसाय, उद्योग, उच्च शिक्षण करुन यश मिळविले आहे. आज चर्मकार समाजातील मुले आयएएस, आयपीएस होत आहेत. विदेशात जात आहेत. मोठे उद्योजक घडत आहेत. हे सकारात्मक बदल समाजात घडत असताना विशेषतः ग्रामीण भागातील युवकांमधील नैराश्य दूर करण्यासाठी व समाजात परिवर्तन घडविण्यासाठी अशा मेळाव्याच्या माध्यमातून योजनांची माहिती व त्याचे लाभ पोहोचविणे हेच मुळ उद्देश असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते २८ ऑक्टोबर रोजी सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉनमध्ये संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने आयोजित रोजगार व माहिती मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश ढाबरे, जिप समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे, सडक अर्जुनी पंस सभापती गिरधर हत्तीमारे, अर्जुनी मोर पंस सभापती अरविंद शिवणकर, युवा उद्योजिका पद्मजा राजगुरु, विभागीय व्यवस्थापक आलोक मिश्रा, पंस उपसभापती राजेश कठाणे, शारदाताई बडोले, अमर तांडेकर, जितqसग जगने, जिप सदस्य शिला चव्हाण, तेजुकला गहाणे, रामू जगनीत, चव्हाण गुरुजी, श्री बरय्या, रतन वासनिक, मनोहर चौरे, गंगाधर सोनवने आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. बडोले म्हणाले की, जशा उद्योगपतींच्या वस्तू सर्वत्र विकल्या जातात तशाच लीडकॉमच्या वस्तू विकण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दुकाने सुरु करण्याचे कार्य आम्ही करीत आहोत. गटईच्या निविदा काढल्या जात आहेत. युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगार उभा करण्यासाठी मागील चार वर्षात मोठे कार्य झाले आहे. जिल्ह्यातही मोठे प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी ५० एकर जागेचा शोध सुरु आहे. केंद्र व राज्य सरकारचे चर्मकार समाजासाठी असलेल्या ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना, प्रशिक्षण योजना, गटई स्टॉल योजना, मुदत कर्ज योजना, सुक्ष्म पत पुरवठा योजना, महिला समृध्दी योजना, महिला किसान योजना, शैक्षणिक कर्ज आदी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, महामंडळाच्या योजना राबविताना त्या तळागळापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यातील प्रशिक्षण प्राप्त युवकांनी मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार उभारुन आदर्श उभे केले आहे. यात नुकत्याच सडक अर्जुनी तालुक्यात १३ युवकांनी प्रशिक्षणानंतर उभारलेले स्वयंरोजगार हे उदाहरण आहे. यावेळी मुंबईच्या युवा महिला उद्योजिका पद्मजा राजगुरु यांनी आपली नोकरी ते यशस्वी उद्योजिका होण्याचा प्रवास कथन केला. एका आयटी कंपनीत ५० हजाराच्या नोकरीवर असताना एक लेख वाचून स्वतःचा उद्योग उभारण्याचे स्वप्न बाळगत लिडकॉमचे प्रशिक्षण पूर्ण करून लेदर उद्योगात साकारले असल्याचे त्यांनी सांगितले. तर उद्योग क्षेत्रात खूप वाव असून जिल्ह्यातील युवकांनी येथील जागा व कच्चा मालाचा उपयोग करुन नवीन उद्योग उभारावे, असे आवाहनही त्यांनी केले. आलोक मिश्रा यांनी, रोजगार व स्वयंरोजगार निवडीसंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी जिल्ह्यातील चर्मकार समाजातील यशस्वी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच १३ लाभाथ्र्यांना प्रत्येकी ५० हजाराचे कर्ज वितरीत करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने विजय बिसेन, डॉ. लक्ष्मण भगत, रघुनाथ लांजेवार, कविता रंगारी, लक्ष्मीकांत धानगाये यांच्यासह लीडकॉमचे वरिष्ठ अधिकारी तुषार कुळकर्णी, दिलीप दुतडे, वैभव खटावकर, पुणेवार, काथवटे, ढगे, पांडे, श्रीमती भगत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनिल मेश्राम यांनी केले. तर आभार लीडकॉमचे जिल्हा व्यवस्थापक पी. पी. महाजन यांनी मानले.