सिलेझरीत धानाचे पूंजणे जळून खाक

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.10 :तालुक्यातील ग्राम सिलेझरी येथील रहिवासी मंदा भगवान टेंभूर्णे यांच्या शेतातील धानाचे पूंजणे जळून खाक झाले. सुमारे दोन एकरातील धान या पूंजण्यात जळून खाक झाल्याने त्यांचे सुमारे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
मंदा टेंभूर्णे यांच्या पतीचे निधन झाले असून एक मुलगा, एक मुलगी व सासू अशा परिवाराच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मोलमजूरी तसेच अतिक्रमीत जमिनीवर मागील कित्येक वर्षांपासून त्या धानाचे उत्पादन घेत आहेत. यातच सुमारे दोन एकर जमिनीत त्यांनी धानाचे पीक घेतले. आरपीएन जातीचे धान त्यांनी काढले व धानाचे पूंजणे शेतात ठेवले होते. गाव तपासून काही अंतरावर असलेल्या त्यांच्या शेतातील धानाचे पूंजणे अज्ञात इसमांनी जाळल्याचे बोलले जात असून बुधवारी (दि.७) सकाळी ६ वाजता हा प्रकार बघावयास मिळाला.
यात त्यांचे सुमारे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. प्रकरणी त्यांनी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून ठाणेदार शिवराम कुंभरे यांनी तपास सुरू केला आहे.