मातृभाषेतील साहित्य व्यक्तिमत्व घडविते-प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे

0
15
  • मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप
  • जिल्हा न्यायालयाच्या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

वाशिम, दि. १५ : मानसशास्त्राच्या अभ्यासानुसार लहान मुले ही अनुकरण करतात. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील वातावरणाचा प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर असतो. तसेच मातृभाषेतील शिक्षण व साहित्य हे त्याचे व्यक्तिमत्व घडविते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. जटाळे यांनी केले. वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघ यांच्यावतीने जिल्हा न्यायालयात १ ते १५ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.यावेळी ‘काव्याग्रह’चे व्यवस्थापकीय संपादक विठ्ठल जोशी, जिल्हा विधिज्ञ संघाचे अध्यक्ष अॅड. अजयकुमार बेरिया, उपाध्यक्ष ॲड. अमरसिंह रेशवाल, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्री. गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

न्या. जटाळे म्हणाले, माता आणि मातृभाषा आपल्या जीवनाला दिशा देतात. मातृभाषेतील साहित्य वाचनाची आवड जोपासली पाहिजे. गेल्या १५ दिवसांमध्ये जिल्हा न्यायालयात आयोजित विविध उपक्रमांमुळे मराठी साहित्य क्षेत्रातील अनेक नामवंत लेखक, कवी यांचे विचार ऐकण्याची संधी जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी व विधिज्ञ यांना मिळाली. या विचारांमुळे आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारण्यास मदत होणार आहे. परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून मराठी भाषा व साहित्याचे अनुषंगाने झालेल्या मंथनातून आपल्या मातृभाषेची महती, तिचे वैभव आपल्याला माहित झाले आहे. अतिशय समृद्ध असलेल्या आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. न्यायपालिकेतील प्रत्येक घटकाने मराठीचा जास्तीत जास्त व अचूक वापर करण्यावर भर द्यावा. तसेच संवाद साधताना मराठी भाषेला प्राधान्य देवून मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. जोशी यांनी यावेळी ‘मराठी भाषेतील नियतकालिकांचे योगदान’ या विषयावर विचार व्यक्त केले. ते म्हणाले, मराठी साहित्य चळवळीच्या विकासात नियतकालिके व अनियतकालिकांचे महत्वपूर्ण योगदान आहे. साहित्य क्षेत्रातील नवनवीन ग्रंथांची माहिती वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम नियतकालिके करतात. कविता, कथा, ललित लेखन यासारख्या विषयांना वाहून घेतलेल्या नियतकालिकांनी व अनियतकालिकांनी नवोदित कवी व लेखकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देवून त्यांच्यातील कवी, लेखक लोकांपर्यंत पोहोचविला असल्याचे त्यांनी सांगितले. वाशिम येथून प्रकाशित होत असलेल्या ‘काव्याग्रह’ या नामांकित  नियतकालिकाविषयी त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. तसेच यामाध्यमातून मराठी कविता क्षेत्रात देण्यात येत असलेल्या योगदानाबद्दल सांगितले.

ॲड. गवळी म्हणाले, जिल्हा न्यायालयात साजरा झालेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात वेगवेगळ्या विषयांवर मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. तसेच मायबोली मराठीच्या संवर्धनाची जबाबदारी यापुढे आपल्याला पेलायची असून त्याकरिता कृतीशील प्रयत्न करण्याचा संकल्प सर्वांनी करावा. तसेच मराठी भाषेत कोणत्याही इतर भाषेची सरमिसळ न करता मराठीची गोडी अवीट ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त आयोजित कार्यक्रमांचे नियोजन करणारे न्या. एस. पी. शिंदे यांच्यासह सहभागी होवून मार्गदर्शन केलेले विठ्ठल जोशी, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, साहित्यिक प्रा. धोंडूजा इंगोले, किसन गंगावणे, कथाकार पांडुरंग मोरे, राजेश ठवकर, कवी महेंद्र ताजने, प्रा. सुनिता अवचार यांच्यासह या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहकार्य करणारे विधिज्ञ, न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला न्या. एस. बी. पराते, न्या. डॉ. रचना तेहरा, न्या. एस. पी. शिंदे, न्या. एस. पी. बुंदे, न्या. एस. पी. वानखेडे, न्या. एस. व्ही. फुलबांधे, न्या. श्रीमती डॉ. यु. टी. मुसळे, न्या. श्रीमती के. बी. गीते, न्या. पी. एच. नेरकर, जिल्हा विधीज्ञ संघाच्या कोषाध्यक्ष ॲड. श्रध्दा अग्रवाल, सचिव यांच्यासह विधीज्ञ मंडळी, पक्षकार, न्यायालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे उपस्थितांचे आभार जिल्हा विधीज्ञ संघाचे सचिव ॲड. प्रसाद ढवळे यांनी मानले.