वाशिम, दि. ०७ : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र शेतकरी कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांचे एक दिवसीय प्रशिक्षण बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झाले.
याप्रसंगी तहसीलदार बळवंत अरखराव, राजू सुरडकर, राजेश वजीरे, वैशाख वाहूरवाघ, रणजीत भोसले, सुनील चव्हाण यांच्यासह तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. मीना यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून आवश्यक सूचना दिल्या. तसेच महसूलच्या तहसीलदार शीतल वाणी यांनी माहिती संकलनासाठी वापरायची कार्यपद्धती याविषयी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे माहिती दिली. यामध्ये ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय समितीची रचना, त्यांच्या जबाबदारी आदी माहितीचा यामध्ये समावेश होता.