गडचिरोली-चिमूर पाच उमेदवार निवडणुकीच्या रिगंणात

0
9

गडचिरोली,दि.29ः-गडचिरोली -चिमूर (अ.ज) लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या  शेवटच्या दिवशी डॉ. किरसान एन. डी.- अपक्ष यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत.गडचिरोली -चिमूर (अ.ज.) लोकसभा मतदारसंघात भाजपाचे अशोक महादेवराव नेते, इंडिशन नॅशनल कॉंग्रेसचे डॉ. नामदेव दल्लुजी उसेंडी, बहुजन समाज पार्टीचे हरीचंद्र नागोजी मंगाम व दोन नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियातर्फे देवराव मोनबा नन्नावरे, वंचित बहुजन आघाडीतर्फे डॉ. रमेशकुमार बाबुरावजी गजबे असे एकूण पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्ह्यात मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. निवडणूक विषयक प्रशिक्षण कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येत असून यामध्ये ईव्हीएम तसेच व्हिव्हीपॅट संदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्ह्यात १९५0 हा टोलफ्री क्रमांक सुरु करण्यात आलेला आहे. निवडणूक आयोगाने सी-व्हिजील हे अँपही निवडणुकीसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करुन दिलेले आहे.

११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे व मतदानाची टक्केवारी वाढवावी या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक विभागाच्यावतीने आज २९ मार्च रोजी गडचिरोली येथे मोटारसायकल मतदार जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.